धाराशिव (भाग 3) | रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादावर चालणाऱ्या शहरातील नामांकित महाविद्यालयातील छेडछाडीच्या आणि दडपशाहीच्या प्रकरणाचा ‘धाराशिव लाइव्ह ‘ने सलग पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे काटेकोर पालन करत ‘धाराशिव लाइव्हने पीडितेची आणि संस्थेची ओळख गुप्त ठेवून या गैरकारभाराला वाचा फोडली होती. “अशी कोणतीही घटना घडलीच नाही,” असा कांगावा करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रभारी प्राचार्यांना (पुतण्याला) या प्रकरणाचा जबर फटका बसला असून, त्यांचे प्राचार्यपद गेले आहे. आता थेट पुणे जिल्ह्यातून ‘मंजुळ स्वर’ असणारे नवे प्राचार्य रुजू झाले आहेत.
असे असले तरी, या निमित्ताने महाविद्यालयात चालणारे अनेक ‘काळे धंदे’ चव्हाट्यावर आले आहेत:
-
काका-पुतण्याच्या मनमानीला ‘ब्रेक’:
नवे प्राचार्य रुजू झाल्याने संस्थेला स्वतःची जहागिरी समजणाऱ्या काका-पुतण्याची सद्दी अखेर मोडीत निघाली आहे. निवृत्तीनंतरही नियम धाब्यावर बसवून काकांनी महाविद्यालय परिसरातच बस्तान मांडण्यासाठी मोठी ताकद लावली होती. संस्थापकांची रोज पूजा करण्याच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांची मर्जी राखायची आणि त्याच निवासातून एका निवडणुकीची सूत्रे हलवायची, असा त्यांचा दिनक्रम होता. पण छेडछाडीच्या प्रकरणाने काकांच्या पापाचा घडा भरला आणि पुतण्यालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
-
‘मास्टर ब्लास्टर’च्या नेमणुकीत आर्थिक घोटाळा?
राज्याच्या मंत्रिमंडळातील एका वजनदार ‘दादां’कडे या संस्थेचे अध्यक्षपद आहे. मात्र, त्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून काकांनी मोठा आर्थिक घोळ केल्याची चर्चा आहे. कौडगावच्या एका ‘मास्टर ब्लास्टर’ची नेमणूक कागदोपत्री २०१८ मध्ये करण्यात आली, मात्र धक्कादायक बाब म्हणजे चक्क २०१३ पासून त्याच्या नावावर पगार उचलला गेल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास काकांचे अनेक ‘आर्थिक कारनामे’ उघडकीस येऊ शकतात.
-
ज्यादा बिलासाठी स्वाभिमानी पेंटरचा छळ:
या काकांचा भ्रष्ट कारभार केवळ इथवरच थांबला नाही. नॅक (NAAC) कमिटीच्या दौऱ्यानिमित्त महाविद्यालयात रंगकाम करणाऱ्या एका पेंटरलाही त्यांनी वेठीस धरले. “ज्यादा रकमेच्या बिलावर सही कर, नाहीतर तुझे पेमेंट देणार नाही,” असा दम काकांनी दिला. मात्र, तो स्वाभिमानी पेंटर या भ्रष्ट काकांसमोर झुकला नाही. त्याने तब्बल दोन वर्षे संघर्ष केला आणि अखेर आपला हक्काचा मोबदला मिळवला.
-
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दडपलेला ‘तो’ उठाव:
दोन वर्षांपूर्वी याच काकांच्या हुकूमशाहीविरोधात महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवाज उठवत थेट कोल्हापूर गाठले होते. मात्र, साम-दाम-दंड-भेद वापरून तो उठाव मोडीत काढण्यात काकांना तेव्हा यश आले. जर त्याचवेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या असंतोषाची दखल घेतली असती, तर आज छेडछाडीसारखे अब्रू वेशीवर टांगणारे प्रकार घडले नसते.
मंत्रिमंडळातील ‘दादा’ लक्ष घालणार का?
प्राचार्य बदलले असले तरी, या ‘काका-पुतण्या’ने संस्थेचे केलेले आर्थिक व नैतिक नुकसान भरून कसे निघणार? पगार उचलण्याच्या नावाखाली झालेला घोटाळा कोण निस्तरणार? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. संस्थेचे अध्यक्ष असलेले ‘दादा’ आता तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का, याकडे संपूर्ण धाराशिवचे लक्ष लागून आहे.




