धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, कळंब तालुक्यातील आंदोरा येथे दोन घरे फोडून तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत धाराशिव शहरातील बार्शी नाका परिसरातून एका तरुणाची दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी अनुक्रमे कळंब आणि आनंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंदोरा येथे साडेचार लाखांची घरफोडी (कळंब पोलिस ठाणे)
कळंब तालुक्यातील आंदोरा येथील भिमराव नागनाथ काळे (वय ५०) यांच्यासह त्यांच्या शेजाऱ्याचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार, २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते २६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातून ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच इतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५४ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भिमराव काळे यांनी २९ एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून कळंब पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी नाका परिसरातून दुचाकी लांबवली (आनंदनगर पोलिस ठाणे)
दुसऱ्या एका घटनेत, आशिष भाऊ शिंदे (वय ३१, रा. हिंगळजवाडी, ता. जि. धाराशिव) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांनी आपली अंदाजे २० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एमएच २५ एएन ०३५३) धाराशिव येथील बार्शी नाक्यावरील सुप्रिया बारसमोर उभी केली होती.
या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने सदर मोटरसायकल चोरून नेली. याप्रकरणी आशिष शिंदे यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलिस करत आहेत.






