धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, वेगवेगळ्या दोन घटनांत अज्ञात चोरट्यांनी सौरऊर्जा कंपनीचे तब्बल ३ लाख ३२ हजारांचे साहित्य आणि एक दुचाकी असा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अनुक्रमे बेंबळी आणि परंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बरमगाव शिवारातून ३.३२ लाखांचे सौरऊर्जेचे साहित्य लंपास
बेंबळी : बेंबळी ते धाराशिव जाणाऱ्या रस्त्यावर बरमगाव बुद्रुक शिवारात ‘सत्कर्म ग्रीन एनर्जी प्रा. लि.’ या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दि. ७ मे रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास ४५०० मीटर डीसी केबल, ११२ नग एमसी-४ कनेक्टर आणि ४००० मीटर कन्ड्युट पाईप असा एकूण ३ लाख ३२ हजार ९९२ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी प्रज्ञा नारायण देशमुख (वय २४, रा. देवळाली, ता. जि. धाराशिव) यांनी मंगळवारी (ता. १९) दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबेवाडीतून दुचाकीची चोरी
परंडा : बार्शी येथील संतोष माता चौक, सुभाष नगर भागात राहणारे रमेश शिवाजी कांबळे (वय ३५) यांची एमएच १३ सीझेड ४८६४ या क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही घटना दि. ३ जून २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील तांबेवाडी येथील अनिल तांबे यांच्या घरासमोर घडली होती.
या जुन्या घटनेप्रकरणी रमेश कांबळे यांनी मंगळवारी (ता. १९ मे २०२६) दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




