धाराशिव शहरातील आठवडी बाजार, राजमाता जिजाऊ उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी मंजूर झालेल्या १८ कोटी रुपयांच्या निधीवरून सध्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र या राजकीय धुरळ्यात एक मूलभूत प्रश्न हरवला आहे, तो म्हणजे *धाराशिवच्या विकासाचा.*
वास्तव असे आहे की, ही कामे आज मंजूर झालेली नाहीत. ती सहा महिन्यांपूर्वीच मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर त्यावर स्थगिती आली. विकासाच्या कामांना स्थगिती का आली, कोणाच्या आग्रहामुळे आली आणि त्या काळात जनतेच्या हिताचा विचार कोणी केला, याची उत्तरे अजूनही जनतेला मिळालेली नाहीत.
योगायोग असा की खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ही स्थगिती उठली. त्यामुळे या निर्णयाला राजकीय रंग मिळणे स्वाभाविक आहे. पण जनतेसाठी महत्त्वाचे काय? स्थगिती कोणी उठवली यापेक्षा कामे प्रत्यक्षात कधी सुरू होतात आणि कधी पूर्ण होतात हे अधिक महत्त्वाचे आहे.
विशेष म्हणजे ही कामे आता नगरपरिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. नगरपरिषद भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रभावाखालील सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे कामांची सूत्रे दुसऱ्या विभागाकडे गेल्यामुळे राजकीय अस्वस्थता निर्माण झाली असेल, तर त्यात आश्चर्य नाही. पण त्या अस्वस्थतेचे रूपांतर पुन्हा एखाद्या स्थगितीत होऊ नये, हीच धाराशिवकरांची अपेक्षा आहे.
गेल्या सहा महिन्यांत कामे रखडलेली असताना ज्यांनी आवाज उठवला नाही, ते आज पत्रकबाजी करत आहेत. पत्रके, पत्रकार परिषद आणि सोशल मीडियावरील दावे-प्रतिदावे यातून राजकीय गुण मिळतील; पण शहराचा विकास होणार नाही. विकासासाठी फाईल पुढे सरकावी लागते, निधी खर्च व्हावा लागतो आणि कामे जमिनीवर उतरावी लागतात.
यापूर्वीही जिल्ह्याने अशा राजकीय संघर्षाची मोठी किंमत मोजली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामांपासून अनेक विकासकामे अडकली होती, अशी चर्चा उघडपणे होत राहिली. त्याचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसला. राजकीय नेते आपापल्या शक्तीप्रदर्शनात व्यस्त राहिले आणि विकासाच्या फाईली धूळ खात पडल्या.
आता ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर स्थगिती उठली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण यानंतर पुन्हा कोणी “कान फुंकून” नवीन अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हा प्रश्न कोणत्या पक्षाचा नाही, तर धाराशिवच्या विकासाचा आहे.
श्रेय कुणीही घ्या, फलकावर कुणाचाही फोटो लावा, उद्घाटनाला कुणीही रिबीन कापा; पण कामे पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. शहराचे रूप पालटले पाहिजे. जनतेला राजकीय वाद नकोत, विकास हवा आहे.
धाराशिवकरांनी अनेक वर्षे राजकीय अहंकाराची किंमत मोजली आहे. आता तरी विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक लागू नये. स्थगिती उठली आहे, ती पुन्हा लागू नये. कारण विकास थांबला की नुकसान कोणाचेच होत नाही, तर संपूर्ण धाराशिवचे होते.
आता श्रेयाच्या लढाईपेक्षा कामांच्या गतीची स्पर्धा सुरू झाली, तरच खऱ्या अर्थाने धाराशिव जिंकेल.
– सुनील ढेपे







