धाराशिव | धाराशिव शहरातील विविध विकासकामांवरील स्थगिती अखेर उठल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत पत्रकबाजी करून अपयश झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
गुरव म्हणाले की, धाराशिव शहरातील ज्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे, ती कामे यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली होती. आता त्याच कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे यांनी स्थगिती उठवली आहे. त्यामुळे श्रेय घेण्यापेक्षा शहरासाठी आतापर्यंत कोणती विकासकामे केली याची यादी संबंधितांनी जनतेसमोर मांडावी, असा टोला त्यांनी लगावला.
राणा पाटील यांच्याकडे सत्ता येऊन जवळपास सहा महिने झाले असून यापूर्वीही ते सत्तेत होते. मात्र त्यांनी धाराशिव शहरासाठी कोणती ठोस विकासकामे केली, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी गुरव यांनी केली. “आम्ही अवघ्या तीन दिवसांत शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी निधी आणला, तर त्याआधीच आमच्यावर टीका करणारी पत्रके प्रसिद्ध झाली. हे हास्यास्पद असून यावरूनच त्यांचे कर्तृत्व दिसून येते,” असेही ते म्हणाले.
“नुसत्या घोषणा आणि गप्पांमधून विकास होत नाही. त्यासाठी विकासाचे व्हिजन आणि काम करण्याची प्रामाणिकता आवश्यक असते. गेल्या ४० वर्षांत जिल्ह्याच्या विकासाचे जे चित्र दिसले, ते सर्वांनी पाहिले आहे. एवढ्या मोठ्या शहरात एक दर्जेदार उद्यानही उभे राहू शकले नाही, हे शहराचे दुर्दैव आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करत गुरव म्हणाले, “हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. आगामी काळात ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आणखी विकासकामे केली जातील आणि विकास म्हणजे काय हे जिल्ह्याला दाखवून दिले जाईल.”
पत्रकबाजीमुळे केवळ माध्यमांमध्ये चर्चा होते, मात्र आम्ही जनतेच्या हिताची कामे प्रत्यक्षात आणि दृश्यमान स्वरूपात करून दाखवू, असा विश्वासही सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केला.
विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!







