धाराशिव: शहरातील शांतिनिकेतन कॉलनी भागात जागेच्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी (ता. २०) आनंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारीस अहमद इर्शाद सय्यद (वय ३२, रा. रजा कॉलनी, गालिब नगर, धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शांतिनिकेतन कॉलनी परिसरातील सर्व्हे नंबर १६४/४ मधील जागेवरून फिर्यादी वारीस सय्यद आणि आरोपी यांच्यात वाद होता.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून वारीस यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. यात वारीस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, यावेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
वारीस सय्यद यांनी बुधवारी (ता. २०) दिलेल्या प्रथम खबरीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलिस करत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे:
-
मकबुल हादी सय्यद
-
मन्सूर मकबुल सय्यद
-
रतीयाबी मकबुल सय्यद
-
शहेबाज बेम उस्मान पटेल
-
खलील हादी सय्यद
-
अमीन मकबुल सय्यद
-
आशीब हादी सय्यद
-
जोदा मन्सूर सय्यद (सर्व रा. शांतिनिकेतन कॉलनी, धाराशिव)






