धाराशिव आणि कळंब नगरपालिकेत सध्या जे ‘पळवापळवीचे’ राजकारण सुरू आहे, ते पाहता राजकीय नेत्यांनी ‘खोके’ आणि ‘पळवापळवी’चा एखादा अधिकृत इव्हेंटच जाहीर करायला हवा! एकेकाळी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आता एकमेकांचेच नगरसेवक पळवण्यासाठी उभे ठाकले आहेत. आणि या सगळ्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र अक्षरशः ‘बाजार’ उठला आहे!
कळंबचा ‘लॉट’ आणि साहेबांची ‘खोके’ नीती!
कळंब नगरपालिकेत ठाकरे गटाचे ९ नगरसेवक होते. यापैकी एकाने १५ दिवसांपूर्वीच ‘ड्रग्ज’ प्रकरणात जेलची हवा खाल्ली (त्याला ‘वॉशिंग मशीन’ मिळाली नाही). उरलेले ८ आणि १ स्वीकृत अशा ९ जणांनी थेट सोलापुरात जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.
पण हे अचानक का झाले? तर याचे मूळ साहेबांच्या (आमदार राणा पाटील) आणि भावी खासदारांच्या (मल्हार पाटील) ‘एकाधिकारशाही’त दडले आहे! घरातल्या जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी या पिता-पुत्रांविरुद्ध उघड बंड पुकारल्याने, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी बाहेरचे नगरसेवक विकत घेण्याची मोहीम उघडली.
सर्वात मोठी कॉमेडी म्हणजे, कळंबचे हे नगरसेवक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्कात होते आणि ते शिंदे गटात जाणार होते. पण साहेबांनी ऐनवेळी ‘खोक्यांची’ जादू केली आणि ओमराजेंच्या तोंडचा घास पळवून त्यांना थेट भाजपमध्ये नेले!
गाडीत ‘खोक्यांवरून’ राडा अन् १ थेट बंगल्यावर!

कळंबच्या यशानंतर साहेबांनी धाराशिवकडे मोर्चा वळवला. ठाकरे गटाचे ७ पैकी ५ नगरसेवक गळाला लावले आणि त्यांची गाडी मुंबईकडे रवाना झाली. पण वाटेतच या नगरसेवकांमध्ये ‘खोक्यांच्या’ वाटणीवरून (किंवा आकडेवारीवरून) भयंकर हमरीतुमरी झाली.
राडा एवढा वाढला की ५ पैकी ४ नगरसेवकांनी गाडीतून यू-टर्न मारला आणि ते पुन्हा धाराशिवला आले. पण उरलेला १ नगरसेवक मात्र थेट मुंबईत राणा पाटलांच्या बंगल्यावर जाऊन पोहोचला! इकडे जे ४ नगरसेवक धाराशिवला परतले, त्यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगेच ‘कॅच’ केले, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेले आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणला. (म्हणजे साहेबांनी कळंबमध्ये जो ओमराजेंचा गेम केला, त्याची परतफेड ओमराजेंनी धाराशिवमध्ये केली!)
‘१ कोटीचा गद्दार, दाढीवाला बोका!’
या सगळ्यात सर्वात जास्त हवा झाली ती एका ‘दाढीवाल्या’ नगरसेवकाची! हा पठ्ठ्या शेवटपर्यंत ‘तळ्यात-मळ्यात’ करत होता. भाजपचा एक विरोधी कार्यकर्ता त्याला उघडपणे ब्लॅकमेल करत होता. या दाढी वाल्याविरुद्ध आधी ‘गद्दार’ असे स्टेटस ठेवले, मग तडजोड झाल्यावर डिलीट केले. पण शेवटी तो दाढीवाला अखेर शिंदे सेनेतच गेला.
यानंतर मात्र समतानगरमध्ये जो राडा झाला, तो ऐतिहासिक होता! रातोरात या नगरसेवकाचे भडक होर्डिंग्ज शहरात झळकले. या बॅनरवर स्पष्ट लिहिले होते— “१ कोटीचा गद्दार… १ खोका, मतदाराला दिला धोका.. क्लीन समतेचा दाढीवाला बोका! सोसायटी लुटली, तिजोरी फोडली, एक कोटी घेऊन निष्ठा विकली!”
(या ऐतिहासिक बॅनरचा पुरावा तुम्ही पाहू शकता!)
नगरपालिकेने हे होर्डिंग्ज नंतर तातडीने फाडून काढले असले, तरी सोशल मीडियावर मात्र हा ‘दाढीवाला बोका’ चांगलाच व्हायरल झाला आहे!
गटनेताच ‘कमळ’ हातात घेऊन बंगल्यावर; मग अपात्र कोण ठरणार?
आता या नाटकात सर्वात मोठा ‘कायदेशीर सस्पेन्स’ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कडक इशारा दिला आहे की, “शिंदे गटात प्रवेश केलेल्या या ४ नगरसेवकांना आम्ही कोर्टात जाऊन अपात्र ठरवू!”
पण इथंच खरी गोम आणि राजकारणाची गंमत आहे! नगरपालिकेतील शिवसेनेचा अधिकृत ‘गटनेता’ कोण आहे? तर तो ५ वा नगरसेवक, जो सध्या राणा पाटलांच्या बंगल्यावर भाजपच्या आश्रयाला गेला आहे!
आता विचार करा… ४ नगरसेवक शिंदे गटाकडे गेलेत आणि त्यांचा अधिकृत ‘गटनेता’ भाजपच्या (राणा पाटलांच्या) बंगल्यावर बसलाय! कायद्यानुसार गटनेता जो व्हीप काढेल, तो ग्राह्य धरला जातो. मग आता हा गटनेता कोणाला अपात्र करणार? आणि आमदार कैलास पाटील कोर्टात कोणाविरुद्ध दाद मागणार? हा सगळाच पेच एवढा गुंतागुंतीचा झालाय की, निवडणूक आयोग आणि वकिलांनाही यातून मार्ग काढताना घाम फुटणार आहे!
थोडक्यात सांगायचे तर, धाराशिवच्या या राजकीय सर्कशीत रोज नवे खेळ सुरू आहेत. ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या या भांडणात, ‘दाढीवाला बोका’ आणि ‘गटनेता’ यांनीच खरा सस्पेन्स वाढवला आहे!



