धाराशिव: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जहागीरदारवाडी रेल्वे ब्रीजजवळ शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पोलिसांना धमकी दिल्याच्या कारणावरून गावातील ९ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरुणाने पोलिसांवर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. “ग्रामीण पोलीस वाहनचालकांकडून विनाकारण पैसे उकळत होते, त्याचे व्हिडीओ शूटिंग (Video Shooting) केल्यामुळे पोलिसांनी मला बेदम मारहाण करून उलट माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला,” असा दावा या तरुणाने केला आहे. या ‘पोलीस विरुद्ध ग्रामस्थ’ वादामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस प्रशासनाची बाजू: “तुम्ही येथे केसेस करायच्या नाहीत” म्हणत पोलिसांना धमकावले
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अविनाश दिगंबर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ते आपल्या पोलीस स्टाफसह जहागीरदारवाडी शिवारातील रेल्वे ब्रीजजवळ अधिकृत शासकीय कामकाज (वाहन तपासणी व दंडात्मक कारवाई) करत उभे होते.
या दरम्यान, गावातील काही तरुणांनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी रस्त्यावर त्यांचे वाहन आडवे लावून पोलिसांची शासकीय गाडी अडवली. “तुम्ही आमच्या भागात येथे केसेस करायच्या नाहीत,” असे म्हणत आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घातली. फिर्यादी पोलीस अंमलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखून, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
-
गुन्हा दाखल झालेले आरोपी: आकाश विनायक राठोड, अशोक जानराव राठोड, अतुल राजेंद्र पवार, प्रल्हाद राठोड आणि त्यांच्यासोबत असलेले इतर ५ अनोळखी इसम (सर्व रा. जहागीरदारवाडी, ता. जि. धाराशिव).
-
पोलीस कारवाई: पोलीस अंमलदार अविनाश शिंदे यांच्या फिर्यादीवरून ७ जून रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील ९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२१ (शासकीय कर्मचाऱ्याला कामापासून रोखणे), १२६(२), १८९(२), १९० आणि ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाचा पलटवार: पोलिसांकडून बेकायदेशीर वसुली सुरू होती; म्हणून मारहाण
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश विनायक राठोड याने समोर येत पोलिसांच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
“धाराशिव ग्रामीण पोलीस जहागीरदारवाडी शिवारात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना विनाकारण अडवून, त्यांना दमदाटी करून बेकायदेशीररी्या पैशांची वसुली करत होते. पोलिसांचा हा भ्रष्ट कारभार उघडा पाडण्यासाठी मी माझ्या मोबाईलवरून त्याचे व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. आपण लाच घेत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाहताच पोलीस कर्मचाऱ्यांचा थरकाप उडाला. त्यांनी चिडून जाऊन माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि मला बेदम मारहाण केली. आपली बाजू लपवण्यासाठी आणि मला अडकवण्यासाठी पोलिसांनी उलट माझ्यावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे.”
– आकाश विनायक राठोड (संबंधित तरुण, जहागीरदारवाडी)
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे आणि तरुणाने थेट पुराव्यासह (व्हिडीओ) पोलिसांवर मारहाण व भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात खरंच ग्रामस्थांनी पोलिसांवर दादागिरी केली की पोलिसांनी लाचखोरी लपवण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केला, याचा निष्पक्ष तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी जहागीरदारवाडी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.





