भूम: शेत नांगरण्याच्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबावर लाथाबुक्क्यांनी आणि काठी, खोऱ्याच्या दांड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुटुंबातील सदस्यांना गंभीर मारहाण करण्यासोबतच महिलांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहेत. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी दुधोडी (ता. भूम) येथील गट क्रमांक ३५ च्या बांधावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिनिनाथ अजिनाथ महानवर (वय ३५, रा. दुधोडी) हे आपल्या शेतात असताना आरोपी अतुल रावण महानवर, संगीता रावण महानवर (दोघे रा. दुधोडी), माऊली संदीपान महानवर (रा. बावी, ता. भूम) आणि बबलू संजय तांबे (रा. हाळगाव, ता. जामखेड, जि. बीड) यांनी त्यांना गाठले. शेत नांगरण्याच्या कारणावरून आरोपींनी मिनिनाथ आणि त्यांच्या आई सिंधुबाई महानवर यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी लाथाबुक्क्यांसह काठी आणि खोऱ्याच्या दांड्याने त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
मिनिनाथ यांचा भाऊ रमेश आणि वहिनी अश्विनी महानवर हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आले असता, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. इतकेच नव्हे, तर भांडणाचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादीच्या वहिनीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनीगंठण आणि कानातील दीड तोळ्यांचे झुमके जबरदस्तीने ओढून नेले.
या घटनेनंतर मिनिनाथ महानवर यांनी २१ मे २०२६ रोजी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११९(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.





