कळंब: जुन्या वादाची कुरापत काढून एका कुटुंबावर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १९ मे २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कोठाळवाडी (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील शेत गट क्र. ५५ मध्ये घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्या देसाई कोठावळे (वय ३६, रा. कोठाळवाडी) या आपल्या शेतात असताना आरोपी अमित महादेव वाघमारे, राधा महादेव वाघमारे आणि महादेव दगडू वाघमारे (सर्व रा. कोठाळवाडी) यांनी त्यांना गाठले. जुन्या वादाचे कारण पुढे करत आरोपींनी फिर्यादी विद्या कोठावळे, त्यांचे पती आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
इतक्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच, जातेवेळी सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विद्या कोठावळे यांनी २१ मे २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





