नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील साई मंगल कार्यालयाजवळ दुचाकी अंगावर आल्याच्या आणि कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (ता. १३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दोन्ही बाजूंनी काठ्या आणि लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आला असून, एका महिलेचे ४ तोळ्यांचे मंगळसूत्रही गहाळ झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. १४) नळदुर्ग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील तब्बल २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या गटाची फिर्याद : दुचाकी अंगावर आल्याचा जाब विचारल्याने मारहाण
या घटनेत पहिली फिर्याद महेबुब सत्तार शेख (वय ४२, रा. इटकळ) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, महेबुब शेख आणि त्यांचे मित्र शामराव क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना, समोरून आलेल्या आरोपींनी त्यांची दुचाकी अंगावर आणली. ‘दुचाकी अंगावर का आणली?’ याचा जाब विचारल्याच्या रागातून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी महेश प्रभाकर पाटील, अजित अशोक पाटील, शैलेश्वर प्रभाकर पाटील, सोमनाथ पाटील, पप्पू पाटील (सर्व रा. नांदुरी, ता. तुळजापूर), धनराज प्रभाकर कुताडे आणि संदीप चिनगुंडे (दोघे रा. अणदूर) या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या गटाची फिर्याद : मारहाणीत महिलेचे मंगळसूत्र तुटले
दुसऱ्या गटाकडून महेश प्रभाकर पाटील (वय ५३, रा. नांदुरी) यांनी उलट फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश पाटील, अजित पाटील, शैलेश्वर पाटील, त्यांचे मेहुणे धनराज कुताडे आणि संदीप चिनगुंडे यांना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाने शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या झटापटीत फिर्यादीचे मेहुणे धनराज यांची पत्नी वैशाली कुताडे यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र तुटून खाली पडले, तसेच जमावाने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या उलट फिर्यादीवरून हारुण शेख, दौला शेख, अफसर शेख, तौफीक शेख, जहर शेख, समीर मुजावर, आशपाक मुजावर, खादीर शेख, सादीक शेख, अफजल मुजावर, अफजल शेख, जैनुद्दीन शेख, अरबाज शेख, फत्तू खुदादे, असलम मुजावर, मदार शेख, शरीफ शेख, रेहान शेख, महेबुब नदाफ, हुजेफा शेख आणि आयान मुजावर (सर्व रा. इटकळ) अशा एकूण २१ जणांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या परस्परविरोधी गुन्ह्यांमुळे इटकळ परिसरात तणावाचे वातावरण असून, नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





