धाराशिव : पुणे येथे आत्महत्या केलेल्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी सकाळी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रथमेश यांच्या मातोश्रींच्या हाती आर्थिक मदत सुपूर्द केली.
आ. रोहित पवार यांनी प्रथमेश यांच्या मातोश्री व कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. या कठीण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुटुंबीयांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आ. पवार यांनी परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रथमेश यांच्या मातोश्रींना घरकुल योजना तसेच निराधार योजनेचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी तहसीलदारांना दिल्या.
प्रथमेश अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह खासापुरी गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाढत असलेला मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण गांभीर्याने विचारात घेण्याची गरज असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.
“प्रथमेशच्या मृत्यूकडे केवळ आर्थिक तणावाच्या चौकटीत पाहता येणार नाही. स्पर्धा परीक्षा वेळेत न होणे, पेपरफुटीच्या घटना, निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब आणि सातत्याने निर्माण होणारी अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांना घरून आर्थिक आधार मिळण्यातही अडचणी निर्माण होत आहेत,” अशी चिंता आ. पवार यांनी व्यक्त केली.
पारदर्शक आणि कालबद्ध परीक्षा व्यवस्था गरजेची
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित स्पर्धा परीक्षांची व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि कालबद्ध असणे ही शासनाची जबाबदारी आहे. परीक्षा प्रक्रिया, निकाल आणि भरतीबाबत वारंवार निर्माण होणारी अनिश्चितता दूर करून विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे आ. पवार यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सातत्याने आवाज उठवत असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष पुढेही सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अडचणींबाबत संवाद साधावा
“कितीही कठीण परिस्थिती आली तरी कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. अडचणी एकट्याने सहन करण्याऐवजी कुटुंबीय, मित्र, शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा,” असे आवाहन आ. रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
या सांत्वनपर भेटीवेळी माजी आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद, पंकजनाना बोराडे, रविकांत वरपे, जिल्हा सचिव सुहास ठोंगे, जिल्हा उपाध्यक्ष जोतीराम मिस्किन, तालुकाध्यक्ष किरण करळे, माजी सैनिक विभागाचे तालुकाध्यक्ष सुरेश कुंभार, युवक तालुकाध्यक्ष प्रवीण गरड, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, युवक कार्याध्यक्ष सज्जन गाडगे, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चाबुकस्वार, तालुकाध्यक्ष ऋषिकेश पाटील, ठवरे मेजर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





