धाराशिव | भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या कथित अपमान प्रकरणाचे पडसाद आता अधिक तीव्र होत असून, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. “पक्ष हा कुणाच्याही मालकीचा नाही. आम्ही २५ ते ३० वर्षे संघर्ष करून भाजप वाढवला आहे. सत्ता आल्यावर मागून आलेल्या लोकांनी पक्षाचे मालक होण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा त्यांनी दिला.
चालुक्य म्हणाले, “जुन्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला गेला पाहिजे. ॲड. अनिल काळे यांच्याबाबत घडलेला प्रकार चुकीचा आणि निषेधार्ह आहे. पक्षात नवीन आलेल्या नेत्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा अवमान करणे खपवून घेतले जाणार नाही.”
“एकाच घरात दोन संविधानिक पदे; मग कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का?”
एकाच कुटुंबात दोन-दोन संविधानिक पदे मिळत असताना सामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त सतरंज्या उचलायच्या का, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. “स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या घालायच्या आणि कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान द्यायचे, हे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
“फोटो न टाकणे म्हणजे मनाचा कोतेपणा”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुळजापूर दौऱ्यातील स्वागत कमानी व बॅनरवर तत्कालीन जिल्हाध्यक्षांसह इतर प्रमुख नेत्यांचे फोटो नसल्याच्या मुद्द्यावरही चालुक्य यांनी नाराजी व्यक्त केली. “फोटो नसल्याने काही फरक पडत नाही, पण त्यातून मनाचा कोतेपणा दिसून येतो,” असा टोला त्यांनी लगावला.
“काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती भाजपात आणू नका”
राणा पाटील आणि बसवराज पाटील यांचा उल्लेख करत चालुक्य म्हणाले, “ज्या नेत्यांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला, त्यांचे आम्ही पक्षात स्वागत केले. मात्र ते आजही काँग्रेस-राष्ट्रवादीतील कार्यपद्धती भाजपात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही.”
“कार्यकर्त्यांऐवजी वैयक्तिक समर्थक वाढवले जात आहेत”
भाजपच्या ‘बूथ जिंकेगा तो देश जिंकेगा’ या संकल्पनेला छेद जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष संघटनेत वैयक्तिक समर्थकांना प्राधान्य दिले जात असल्याची टीका केली. “काही जणांचा भविष्यात राजकीय प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून त्यांचा ठरवून पराभव करण्यात आला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालावे
जिल्ह्यातील वाढती गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी याकडे पक्षश्रेष्ठींनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत चालुक्य म्हणाले, “बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. योग्य वेळी त्या सर्वांसमोर मांडू. मात्र सामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा आता दुर्लक्षित करता येणार नाहीत. आम्ही अनिल काळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
अनिल काळे प्रकरणानंतर धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत असून, वरिष्ठ नेतृत्व यावर काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





