धाराशिव: सणासुदीच्या काळात किंवा इतर वेळीही अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा (ता. कळंब) येथे अन्न व औषध प्रशासनाने एका नामांकित ट्रेडिंग कंपनीवर धाड टाकून भेसळीच्या संशयावरून तब्बल २१५ किलो खवा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या खव्याची किंमत सुमारे ४७,३०० रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये राज्यभरात अन्नपदार्थांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत २७ मे २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रो. दि. फंदी आणि नमुना सहायक श्री. बा. उ. शेडगे यांच्या पथकाने येरमाळा येथील ‘मे. सायली खवा ट्रेडींग कंपनी’ या पेढीला अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान विक्री आणि वाहतुकीसाठी साठवून ठेवलेल्या खव्याबाबत भेसळीचा संशय आल्याने, पथकाने तातडीने कारवाई केली. अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी खव्याचे २ नमुने ताब्यात घेतले असून, उर्वरित २१५ किलोचा साठा जागीच जप्त केला.
अहवालानंतर होणार पुढील कारवाई
जप्त केलेले खव्याचे नमुने पुढील प्रयोगशाळा विश्लेषणासाठी (Lab Analysis) पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर, ‘अन्न सुरक्षा व मानदे कायद्या’तर्गत संबंधित पेढीवर पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
सदरची कामगिरी सह आयुक्त (अन्न) श्री. श्री. रा. करकळे (छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि धाराशिवचे सहायक आयुक्त (अन्न) श्री. प्र.शा. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही अन्नपदार्थ खरेदी करताना तो केवळ नोंदणीकृत आणि परवानाधारक आस्थापनांमधूनच खरेदी करावा. तसेच खरेदी केलेल्या प्रत्येक अन्नपदार्थाचे पक्के बिल आवर्जून घ्यावे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत काहीही शंका अथवा तक्रार असल्यास, नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. प्र.शा. काकडे यांनी केले आहे.






