लोकसभेच्या आखाड्यात जनतेने सौ. बकुळाबाईंना असा काही अस्मान दाखवला होता की, बाबो! पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. अचानक नशिबाचे चाक फिरले आणि बकुळाबाईंच्या गळ्यात ‘मिनी मंत्रालया’च्या अध्यक्षपदाची माळ पडली! अध्यक्षपद काय मिळाले, बाईंचा तोरा असा काही वाढलाय की, विचारता सोय नाही. ‘हम करे सो कायदा’ हाच त्यांचा नवा राजकीय मंत्र बनला आहे.
समतानगरचा रस्ता आणि बाईंचा इगो
बकुळाबाईंच्या मनमानी कारभाराचा पहिला बळी ठरला तो पंचायत ते समतानगर जाणारा बिचारा रस्ता. बाईंनी तो एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल चार वेळा बंद पाडला! पण जनताही हुशार, त्यांनी तो उखडून लावला. “लोक काय म्हणतील?” हा प्रश्न सामान्य माणसांसाठी असतो, बकुळाबाईंसाठी नाही! आपला इगो जपण्यासाठी त्यांचा हट्ट काही सुटेना.
‘कॅमेरा’प्रेमी बकुळाबाई आणि ‘वायरल’ वक्तव्ये
बाईंना आता एक नवा छंद जडलाय – कॅमेऱ्यासमोर झळकण्याचा! आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद झाली नाही, तर बाईंचे जेवणच पचत नाही. किमान ३०-४० पत्रकार गोळा करून काहीतरी बरळायचे आणि सॅटेलाईट चॅनेलवाल्यांना ‘ब्रेकिंग न्यूज’चे खाद्य द्यायचे, हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम!
त्यांचे काही ‘सुवर्ण’ विचार:
-
“मी कुठेही खात नाही, खायला भरपूर जागा आहे!” (यावर पत्रकारांनी पराचा कावळा केला आणि बाईंची चांगलीच गोची झाली.)
-
“कामे होत नाहीत, यावर मी काय खोडा घालायला फेसबुक पिंट्या आहे का?” (इथे ‘सूर्यराजें’चे नाव घेण्याऐवजी बाईंनी थेट आपल्या पतीदेवाचेच नाव घेतले आणि नवा गदारोळ उभा राहिला!)
-
तुळजापूरच्या कार्यक्रमात तर त्यांनी कळसच गाठला. “येथील महादेवाचे दर्शन घेतले की माणूस थेट मुख्यमंत्री होतो,” अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. हे ऐकून ठाणेकर सेनापती गडबडले आणि म्हणाले, “नको रे बाबा, आमचे दाढीवाले साहेब सक्षम आहेत!” इकडे नागपूरकर भाऊ मात्र आतल्या आत भलतेच वैतागले.
लिफ्टमध्ये अडकले ‘भक्त’, अन् बाईंची मुक्ताफळे !
सततच्या वादग्रस्त बातम्यांमुळे बकुळाबाई आतून जाम खवळल्या होत्या. ‘आता मीडियासमोर काही बोलायचेच नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली, पण… बकुळाबाई आणि शांतता? शक्यच नाही!
परवाच्या पत्रकार परिषदेला उशीर होत होता. “बाकीचे पत्रकार गेले कुठे?” असे विचारल्यावर समजले की, काही पत्रकार मिनी मंत्रालयाच्या लिफ्टमध्येच अडकले आहेत. हे ऐकताच बाईंच्या तोंडून नकळत वाक्य बाहेर पडले:
“काड्या करणारे पत्रकार असेच लिफ्टमध्ये अडकणार!”
पण खरा ट्विस्ट तर पुढेच होता! ज्यांच्यावर ‘काड्या’ करण्याचा आरोप होता, ते पत्रकार तर बाईंच्या समोरच बसून होते. आणि जे लिफ्टमध्ये अडकले होते, ते दुसरे तिसरे कोणी नसून रोज बाईंची आरती ओवाळणारे, त्यांच्या ‘चमकोगिरी’च्या बातम्या लावणारे त्यांचेच लाडके पत्रकार होते!
आता लिफ्टमधून बाहेर आल्यावर ते लाडके पत्रकार ‘काड्या’ करणारे कसे झाले, यावर पत्रकार वर्गात जी काही खमंग चर्चा रंगली आहे, त्याला तोड नाही!






