नमस्कार वाचकहो! ‘धाराशिव लाइव्ह’च्या या भन्नाट मालिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फेसबुक पिंट्या साहेबांच्या ‘स्वप्न विकण्याच्या’ एका नव्या आणि अत्यंत भारी दुकानाची सफर करणार आहोत. जमिनीवरचे रस्ते आणि चेंबरचे वाभाडे निघाल्यानंतर साहेबांनी आता आपला विकास थेट ‘हवेत’ उडवण्याचा निर्णय घेतला आहे!
चला तर मग, पाहूया साहेबांच्या हवेत विरलेल्या घोषणांचा आणि तुळजापूरकरांना दाखवलेल्या नव्या ‘हवाई’ स्वप्नांचा उडता आढावा!
१. गेल्या वर्षीचे ‘प्राणी संग्रहालय’ गेले कुठे?
बरोबर एक वर्षापूर्वी, म्हणजेच २५ ऑगस्ट २०२५ रोजी फेसबुक पिंट्या साहेबांनी तुळजापूरकरांना एक मोठं स्वप्न विकलं होतं (ज्याची पोस्ट आजही साहेबांच्या फेसबुकवर जिवंत आहे). साहेब म्हणाले होते, “तुळजापूरच्या अपसिंगा आणि मोर्डा गावाशेजारी आपण ‘प्राणी संग्रहालय’ आणि ‘पक्षी पार्क’ उभारणार आहोत. रामदरा तलावाजवळ १०८ फुटी शिल्प साकारून तुळजापूरचा चेहरामोहरा बदलणार आहोत!”
आज वर्ष उलटून गेलं! ना तिथे एखादा पक्षी फिरकला, ना साहेबांचं प्राणी संग्रहालय उभं राहिलं. साहेबांची ही भलीमोठी घोषणा त्याच जंगलात कुठेतरी हरवली आणि हवेत विरून गेली. पण साहेबांना याचं काय सोयरसुतक? त्यांना तर फक्त स्वप्नांचे ‘गाजर’ दाखवायचे असते!
२. साहेबांचे नवे गाजर: तुळजापुरात थेट ‘विमानतळ’!
जमिनीवरचे प्राणी आणि पक्षी गायब झाल्यानंतर, साहेबांनी आता थेट ‘विमान’ उडवण्याची घोषणा केली आहे. तुळजापूर तालुक्यातील ‘माळुंब्रा’ येथे चक्क ४ किलोमीटर लांबीची हवाई धावपट्टी (विमानतळ) उभारली जाणार असल्याचा नवा ‘फुगा’ साहेबांनी हवेत सोडला आहे.
साहेबांच्या ‘दिव्य पत्रकारांनी’ बातम्या छापल्या की, “भारतीय विमान प्राधिकरणाचे शिष्टमंडळ आले, पाहणी केली, लॉजिस्टिक पार्क होणार, कृषी मालाची जलद वाहतूक होणार, ड्रोन निर्मिती होणार…” आणि बरंच काही! साहेबांच्या या घोषणा ऐकून असं वाटतंय की उद्या साहेब थेट तुळजापुरातून ‘चांद्रयान’ सुद्धा लाँच करतील!
३. धाराशिवला धड विमान येईना, अन् तुळजापुरात नवी धावपट्टी?
आता या हवाई घोषणेमागचं ‘लॉजिक’ (Logic) आणि सत्य जरा तपासून बघूया:
-
अंतर फक्त २२ किलोमीटर: धाराशिव ते तुळजापूर हे अंतर अवघे २२ किलोमीटर आहे आणि तिथला रस्ता चार पदरी आहे. एकाच जिल्ह्यात, अवघ्या २२ किलोमीटरच्या अंतरावर सरकार दुसरा नवीन विमानतळ कशाला आणि कसा मंजूर करेल?
-
धाराशिवच्या विमानतळाची अवस्था: मुळात धाराशिवमध्ये एक हवाई धावपट्टी आधीपासूनच अस्तित्वात आहे. तिथे वर्षभरातून एकदा एखादं छोटं विमान उतरतं… तेही कधीतरी एखाद्या मोठ्या मंत्र्याला यायचं असेल तर!
जिथे धाराशिवच्या विमानतळावर साधे कावळे-चिमण्या उडत नाहीत, तिथे तुळजापुरात कोट्यवधी रुपये खर्चून नवी धावपट्टी कशासाठी? हे म्हणजे घरात खायला दाणा नाही, अन् साहेब निघालेत विमान खरेदी करायला!
तात्पर्य: फेसबुक पिंट्या साहेबांना ना तुळजापूरच्या विकासाशी घेणंदेणं आहे, ना तिथल्या पर्यटनाशी. त्यांना फक्त नवनवीन ‘घोषणा’ करून जनतेला गुंगीत ठेवायचे आहे. काल प्राणी संग्रहालय, आज विमानतळ, उद्या कदाचित बुलेट ट्रेन! पण तुळजापूरची जनता आता या भूलथापांना बळी पडणार नाही.
कारण विसरू नका… “यह पब्लिक है, सब जाणती है!”





