परंडा : शेतातील वाळलेले गवत आणि लाकडे पेटवून दिल्याने ही आग शेजारील शेतात पसरून अर्धा एकर ऊस, नारळाची झाडे आणि केबल जळून तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे घडली. तसेच, याप्रकरणी जाब विचारणाऱ्या वृद्ध शेतकरी महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालन एकनाथ गुंडे (वय ६२, रा. आवारपिंपरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे नुकसान झालेल्या व धमकी मिळालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून धनाजी लक्ष्मण घळके (रा. आवारपिंपरी) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १२ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी धनाजी घळके याने स्वतःच्या शेतातील लाकडे आणि वाळलेले गवत जाळण्यासाठी पेटवून दिले होते. मात्र, ही आग भडकून शेजारीच असलेल्या शालन गुंडे यांच्या शेत गट नंबर १३० मध्ये पसरली. या आगीत गुंडे यांच्या शेतातील अर्धा एकर उसाचे पीक जळून खाक झाले. यासोबतच सात नारळाची झाडे आणि दोनशे फूट केबल वायरही जळून नष्ट झाली. या आगीत फिर्यादीचे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या अतोनात नुकसानीबाबत शालन गुंडे यांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने अरेरावी करत शिवीगाळ केली आणि ‘जीवे मारीन’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर शालन गुंडे यांनी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलिसांनी आरोपी धनाजी घळके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६(एफ) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.




