तुळजापूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या मृत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अपघातात ही अंदाजे ६५ वर्षांची अनोळखी महिला जखमी झाली होती. तिला सुरुवातीला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारांची गरज असल्याने त्याच दिवशी ‘१०८’ रुग्णवाहिकेने तिला धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
धाराशिव येथील रुग्णालयात या महिलेवर सलग दोन महिने वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.२४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (नोंद क्र. ०१/२०२६) नोंद करण्यात आली आहे. अद्याप या मयत महिलेची ओळख पटलेली नाही. तरी, या अनोळखी महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास, किंवा तिचे नातेवाईक मिळून आल्यास त्यांनी त्वरित ९६०७९९८७१५ या मोबाईल क्रमांकावर किंवा तुळजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



