तुळजापूर: श्री क्षेत्र तुळजापूर येथील बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, रविवारी एका मुंबईच्या भाविकाची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी पुन्हा एका महिला भाविकाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या अफाट गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिला भाविकाच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण शिताफीने चोरून नेले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती लहू माळी (वय ३७, रा. बार्शी, जि. सोलापूर) असे चोरी झालेल्या महिला भाविकाचे नाव आहे.
बसमध्ये चढताना गर्दीत साधला डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी असलेल्या स्वाती माळी या सोमवार, दि. १ जून रोजी कुलस्वामिनी आय भवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आल्या होत्या. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास त्या तुळजापूर बसस्थानकावर आल्या.
या दरम्यान बसस्थानकावर ‘सोलापूर ते नांदेड’ ही बस आली. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली होती. स्वाती माळी या बसमध्ये चढत असताना, आधीच पाळत ठेवून असलेल्या एका अज्ञात भामट्याने गर्दीचा गैरफायदा घेतला. त्याने स्वाती यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण अत्यंत शिताफीने ओरबाडून घेतले आणि गर्दीत गायब झाला. बसमध्ये बसल्यानंतर गळ्यातील दागिने गायब असल्याचे स्वाती यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरटा पसार झाला होता.
तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद
या मोठ्या चोमीनंतर स्वाती लहू माळी यांनी तातडीने तुळजापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण:
तुळजापूर बसस्थानकावर लागोपाठ दोन दिवसांत दोन भाविकांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसस्थानक परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






