वाशी – ‘आमच्या गावात मळणी मशीन का चालवतो’ तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, लोखंडी रॉड आणि दुधाच्या किटलीने (कॅण्ड) मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. याप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी फिर्याद दाखल झाली असून, वाशी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
रमाकांत प्रभाकर सानप (वय ३४ वर्षे, रा. नांदगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना शनिवार, ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बोरी गावातील आरोपी सुशांत पवार याच्या दूध डेअरी समोरील रस्त्यावर घडली.
फिर्यादी रमाकांत सानप हे तेथे असताना आरोपी सुशांत सुनिल पवार, सुजित संतोष पवार, संतोष कल्याण पवार आणि सुनिल कल्याण पवार (सर्व रा. बोरी, ता. वाशी) यांनी त्यांना अडवले. ‘तू आमच्या गावात मळणी मशीन का चालवतो’ असे म्हणत तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी रमाकांत यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, दुधाच्या किटलीने, तलवारीने आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या हल्ल्यात रमाकांत सानप गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर पाच दिवसांनी रमाकांत सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) आणि भारतीय शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गावात मळणी यंत्र चालवण्यासारख्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.