धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्याजवळील अतिक्रमणे हटवण्याच्या आणि स्वच्छतागृह पाडण्याच्या प्रशासकीय आदेशावरून धाराशिव जिल्ह्यात राजकीय वादंग पेटले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या नियोजित रिसॉर्टचा मार्ग मोकळा करण्यासाठीच गरिबांच्या दुकानांवर आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर (ट्विटर) पोस्ट करत सरकारवर जोरदार तोफ डागली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच तामलवाडी टोलनाक्याला भेट देऊन जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे आणि तेथील सार्वजनिक स्वच्छतागृह पाडण्याचे निर्देश ‘आयआरबी’ (IRB) कंपनीला दिले. या निर्णयामुळे परिसरातील सुमारे ६० स्थानिक दुकानदार, हॉटेलचालक आणि छोट्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीती व खळबळ उडाली आहे.
‘X’ वरील पोस्टमधून हर्षवर्धन सपकाळ यांचे सडकून टीकास्त्र
या मोहिमेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कडाडून टीका केली आहे. सोशल मीडियावर विचारणा करताना त्यांनी म्हटले की:
“पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा ‘विकास’ नेमका कुणासाठी? धाराशिवमधील तामलवाडी टोलनाक्याजवळ दुकाने, हॉटेल्स आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले जात आहेत. याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास २० एकर हायवे-टच जमीन असून रिसॉर्टचे काम सुरू आहे. गरिबांचा रोजगार उद्ध्वस्त करून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय? अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा विशेष आग्रह का? स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरिबांच्या पोटावर पाय, हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय?”
स्वच्छतागृहाच्या मागेच १९ एकर जमीन खरेदी?
तामलवाडी टोलनाक्याजवळ असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या अगदी लगतच पालकमंत्री सरनाईक यांनी तीन शेतकऱ्यांकडून सुमारे १९ ते २० एकर महामार्गालगतची (हायवे-टच) मोक्याची जमीन काही महिन्यांपूर्वीच खरेदी केल्याची चर्चा आहे. हे स्वच्छतागृह व दुकाने पालकमंत्र्यांच्या जमिनीच्या अगदी दर्शनी भागात येत असल्यानेच ते हटवण्याचा विशेष आग्रह धरला जात असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.
जमिनीवर फळबाग फुलवणार; दुकानदारांना जागा देण्याची पालकमंत्र्यांची भूमिका
दरम्यान, या आरोपांवर स्पष्टीकरण समोर आले असून, सध्या या खरेदी केलेल्या जमिनीवर कोणतेही बांधकाम झालेले नाही. या जागेवर रिसॉर्ट नसून फळबाग विकसित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांच्या बाजूने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, “स्थानिक दुकानदारांच्या रोजगाराला माझा कोणताही विरोध नसून, आयआरबी (IRB) कंपनीने या दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी पर्यायी व चांगली जागा उपलब्ध करून द्यावी,” अशी भूमिकाही पालकमंत्री सरनाईक यांनी मांडली आहे.
मात्र, विरोधकांनी या कारवाईवरून थेट पालकमंत्र्यांच्या व्यक्तिगत हितसंबंधांवर बोट ठेवल्यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात हा मुद्दा चांगलाच तापला आहे.





