उमरगा – तालुक्यातील नारंगवाडी येथे हॉटेलमध्ये कामावर येण्याच्या आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका टोळक्याने दोघांना शिवीगाळ करत लोखंडी कत्ती, रॉड, काठी व दगडाने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत फिर्यादी आणि त्यांचा मेहुणा जखमी झाले असून, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. ही घटना ४ मे २०२५ रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी संजय श्रीमंत गायकवाड (वय ४० वर्षे, रा. कोराळ, ता. उमरगा) यांनी ७ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड आणि त्यांचा मेहुणा अमोल कांबळे यांना आरोपींनी हॉटेलमधील कामावर येण्यावरून तसेच आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमवून बाळु विठ्ठल कांबळे, राहुल किसन दलाले, श्रीकांत विठ्ठल कांबळे, सोनाजी बाळु कांबळे, मिनाबाई किसन दलाले, शिवम भरत कांबळे, अश्विनी शिवम कांबळे (सर्व रा. नारंगवाडी, ता. उमरगा) यांनी संगनमत करून गायकवाड व त्यांच्या मेहुण्यास लाथाबुक्यांनी, लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४), (५), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.