कळंब – कळंब तालुक्यातील बोर्डा येथे रस्त्यावर टाकलेली खडी उचलण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सात जणांनी मिळून एका ४२ वर्षीय व्यक्तीला दगड व काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडू अनंतराव शेळके (वय ४२ वर्षे, रा. बोर्डा, ता. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोर्डा गावातील बाळू शिंदे यांच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. रस्त्यावर टाकलेली मोठी खडी उचलण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
यावेळी आरोपी दिनेश शैलेंद्र चव्हाण, सुरज व्यंकट शेळके, गणेश शैलेंद्र चव्हाण, शितल सत्येंद्र चव्हाण, शैलेंद्र विश्वनाथ चव्हाण, व्यंकट श्रीपती शेळके, आणि राहुल (प्रणव) विजेंद्र चव्हाण (सर्व रा. बोर्डा, ता. कळंब) यांनी फिर्यादी बंडू शेळके यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगडाने आणि काठीने मारहाण करून जखमी केले.
या घटनेप्रकरणी बंडू शेळके यांनी दिनांक २ जुलै २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.