धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी शांततेत पण चुरशीने मतदान पार पडले. ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले असले तरी, निकालासाठी मात्र २१ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांसह मतदारांचीही धाकधूक वाढली असून, ‘शहराची कारभारीन ‘ कोण होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मशाल, कमळ की तुतारी? लढत होणार ‘काटे की टक्कर’
नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते. या प्रतिष्ठेच्या जागेसाठी एकूण सहा महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने जोर लावला असला तरी, खरी आणि थेट लढत ही शिवसेना (ठाकरे गट) , भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातच पाहायला मिळाली.
ठाकरे गटाकडून सौ. संगीता सोमनाथ गुरव , भाजप कडून नेहा काकडे आणि शरद पवार गटाकडून सौ. परवीन खलिफा कुरेशी यांच्यात ‘काटे की टक्कर’ झाल्याचे चित्र आहे. शहरातील प्रबुद्ध मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे, हे २१ डिसेंबरलाच स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही गटांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
नगरसेवकपदासाठी २०१ जणांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद
केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरसेवकपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली होती. नगर परिषदेच्या ३९जागांसाठी तब्बल २०१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रत्येक प्रभागात एका-एका मतासाठी उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली आहे. गल्लीबोळात आणि वॉर्डावॉर्डात स्थानिक समीकरणे जुळवताना उमेदवारांची दमछाक झाली.
निकालाची प्रतीक्षा जीवघेणी
मतदान होऊन गेले असले तरी निकालाची तारीख लांबणीवर पडल्याने उमेदवारांची अवस्था ‘धोबी का कुत्ता, न घर का न घाट का’ अशी झाली आहे. २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने पुढील दोन आठवडे उमेदवारांसाठी अत्यंत तणावाचे जाणार आहेत. कोण गुलाल उधळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उर्वरित तीन जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात किती उमेदवार रिंगणात उतरतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.







