तुळजापूर: अहो, कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद तरी कुणाकडे मागायची? ज्या खाकी वर्दीवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते, त्याच वर्दीतल्या एका पठ्ठ्याला आता ‘इश्काचा’ रोग जडल्याचं तुळजापुरात उघडकीस आलं आहे. ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क गावातील एका लेकुरवाळ्या विवाहितेलाच फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या ‘पोलीसगिरीच्या प्रेमकहाणी’मुळे संपूर्ण पोलीस प्रशासनावरच नामुष्की ओढवली आहे.
नेमकं घडलंय तरी काय?
सदर महिलेच्या पतीने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या ‘खाकीतल्या रोमिओ’ची तक्रार केली आहे. तक्रारीनुसार घडलेला थरार असा:
-
घरात एन्ट्री अन् प्रेमप्रकरण: या साहेबांचे तक्रारदाराच्या घरी वारंवार येणे-जाणे सुरू होते. याच दरम्यान साहेबांनी ड्युटी बाजूला ठेवून महिलेशी जवळीक साधली आणि अनैतिक संबंधांची सुरुवात झाली.
-
समज देऊनही ‘ड्युटी’ सुरूच: नवऱ्याने या पोलिसाला अनेकदा ताकीद दिली, पण “इश्क लपविल्या लपत नाही” तसं या साहेबांचं वागणं काही सुधारलं नाही.
-
नवरा बाहेरगावी अन् बायको गायब: अखेर १९ फेब्रुवारी २०२६ रोजी नवरा बाहेरगावी गेला असल्याची संधी साधून या पोलिसाने महिलेला सोबत पळवून नेले.
“मी पोलीस आहे, माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही!”
हा डायलॉग एखाद्या बॉलिवूड सिनेमातला वाटत असला तरी, तो या महाशयांनी खऱ्या आयुष्यात मारला असल्याचा आरोप पतीने केला आहे. पैशांची लालच आणि स्वतः पोलीस असल्याचा रुबाब दाखवून त्याने महिलेला भुरळ घातली. धक्कादायक बाब म्हणजे, जाताना संबंधित महिला केवळ स्वतःच गेली नाही, तर मुलीचा शाळेचा टी.सी. (Transfer Certificate) आणि घरातली महत्त्वाची कागदपत्रेही सोबत घेऊन गेली आहे. सतत फोनवरून संपर्कात राहून हा सगळा ‘प्लॅन’ रचला गेला.
नवऱ्याची धाव थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत!
या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. तक्रारदार पतीने आता थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचे दार ठोठावले आहे. “माझ्या जीवाला धोका असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करा,” अशी मागणी त्याने केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची प्रत थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आली आहे.
अवैध धंद्यांच्या पैशातून वाढली ‘आसुरी वृत्ती’ (चौकट)
“तुळजापूरमध्ये अवैध मटका आणि जुगाराचा बाजार जोरात सुरू आहे. या धंद्यांच्या हफ्त्याच्या पैशांनी कायद्याचे रक्षक आता मूकगिळून गप्प आहेत. याच पैशांच्या सावलीत पोलीस यंत्रणेत अशी आसुरी वृत्ती फोफावत असल्याची ही धक्कादायक स्थिती आहे.”
— रवींद्र साळुंके (सामाजिक कार्यकर्ते, तुळजापूर)
या गंभीर आरोपामुळे तुळजापुरात एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी या ‘खाकीतल्या मजनू’वर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






