धाराशिव: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर धाराशिवचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली राजकीय षडयंत्र रचून लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव लोकशाहीनेच हाणून पाडला,” असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून या संदर्भात आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, “स्वतःच्या घटत्या जनाधारामुळे काहीही करून सत्तेत राहण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवून लोकशाही आणि विरोधकांची गळचेपी करण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आज संसदेत उधळून लावण्यात आले आहेत.”
‘आतातरी बोध घेऊन लोकहिताचे काम करावे’
सरकारला खडेबोल सुनावताना खासदार निंबाळकर यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “हा देश संविधानावर चालत आला आहे आणि यापुढेही चालू राहील. त्यामुळे सरकारने आतातरी यातून बोध घ्यावा आणि केवळ लोकहिताचेच काम करावे, एवढीच सदिच्छा आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.
अटलजींच्या कवितेचा संदर्भ
आपल्या प्रतिक्रियेची सुरुवात आणि शेवट करताना खासदार निंबाळकर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील गाजलेल्या भाषणातील ओळीचा जाणीवपूर्वक संदर्भ दिला आहे. ‘सरकारे आयेगी जाएगी, ये देश रेहना चाहिए,’ या ओळीची आठवण करून देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना देशाचे आणि लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.







