धाराशिव : धाराशिव पंचायत समिती गेट ते समतानगरकडे जाणारा ४० वर्षांचा जुना आणि वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मनमानी डाव आज पुन्हा एकदा उधळून लावण्यात आला आहे. जि.प. अध्यक्षांच्या केवळ तोंडी सांगण्यावरून पहाटेच्या अंधारात रस्त्यावर रोवलेले सिमेंटचे पोल आणि काटेरी कुंपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उखडून फेकत हा रस्ता जनतेसाठी पुन्हा मोकळा केला आहे.
गेली ४० वर्षे हा रस्ता सर्वसामान्यांच्या वहिवाटीत आहे. कोर्ट, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी नागरिकांसाठी हा सर्वात सोयीचा आणि जवळचा (शॉर्टकट) रस्ता आहे. असे असताना, अचानक हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याचा ‘साक्षात्कार’ जि.प. अध्यक्षा अर्चना पाटील यांना कसा झाला? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ त्यांच्या तोंडी आदेशाचा आधार घेत प्रशासनाने हा रस्ता बंद करण्याची दडपशाही सुरू केली आहे.


१ कोटींचा निधी गेला कुठे?
विशेष संतापजनक बाब म्हणजे, शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या निधीतून याच रस्त्याच्या कामासाठी १ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. शहरात इतरत्र रस्त्यांची कामे वेगात सुरू असताना, या रस्त्याच्या बाबतीत नेमकी ‘माशी कुठे शिंकली?’ हे मात्र गुलदस्त्यात आहे. मंजूर झालेला निधी अचानक का थांबवला गेला आणि रस्ता करण्याऐवजी तो बंद का केला जात आहे, याचे उत्तर द्यायला कोणीही तयार नाही.
प्रशासनाचा निर्लज्जपणा; १५ दिवसांत दुसरा प्रयत्न
प्रशासनाने हा रस्ता अडवण्याचा केलेला हा पहिला प्रयत्न नाही. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीही याच पद्धतीने काटेरी कुंपण घालून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यावेळी संतप्त नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरून ते कुंपण मोडून काढले होते. तरीही प्रशासनाने यातून कोणताही धडा न घेता पुन्हा तीच चूक केली.
हा रस्ता वारंवार का बंद केला जात आहे? यामागे नेमके कोणाचे छुपे हितसंबंध दडले आहेत? सर्वसामान्यांची अडवणूक करून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे ना प्रशासनाकडे आहेत, ना पदाधिकाऱ्यांकडे. मात्र ठाकरे गटाने दिलेल्या या सडेतोड उत्तरानंतर तरी प्रशासनाची झोप उघडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





