नळदुर्ग : दहा लाख रुपयांची खंडणी न दिल्यास वीज टॉवर पाडण्याची धमकी देऊन, चक्क चालू लाईनवरील १३२ केव्ही क्षमतेच्या टॉवरचे खांब गॅस कटरने कापल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर तालुक्यातील मुर्टा शिवारात उघडकीस आला आहे. यात ‘टाटा पॉवर’ कंपनीचे तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, लोकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुर्टा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील शेत गट क्र. २९७/२ मध्ये ‘टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लि.’ कंपनीच्या वतीने १३२ केव्ही क्षमतेचा वीज वाहक टॉवर (क्र. २१) उभारण्यात आला आहे. हे शेत आरोपी निखिल भगवान पाटील (रा. मुर्टा) याच्या मालकीचे आहे. या प्रकल्पावर काम करणारे इलेक्ट्रिक इंजिनिअर पार्थ जनकराव त्रिवेदी (वय ३०, मूळ रा. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. लातूर) यांच्याकडे आरोपी निखिल पाटील याने आणखी १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
“पैसे न दिल्यास विद्युत टॉवर कट करून नुकसान करेन,” अशी धमकी आरोपीने इंजिनिअर त्रिवेदी यांना दिली होती. त्यानंतर दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेपूर्वी आरोपीने आपल्याच शेतातील टॉवरचे चारही लोखंडी खांब गॅस कटरच्या साहाय्याने कापले. विशेष म्हणजे, या टॉवरवरून १३२ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीज वाहत असतानाच हा अत्यंत धोकादायक प्रकार करण्यात आला. यामुळे टॉवर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानाही आरोपीने अत्यंत निष्काळजीपणे हे कृत्य केले. या प्रकारात कंपनीच्या साधनसंपत्तीचे तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी इंजिनिअर पार्थ त्रिवेदी यांनी दि. २३ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून, नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी निखिल भगवान पाटील याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ११०, ३२४(५), १२५ सह भारतीय विद्युत अधिनियम कलम १३९, १४० आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.






