तुळजापूर – तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या भांडणाच्या रागातून एका १९ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (दि. ३ मे) मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा अनंत रसाळ (वय १९, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रथमेश कांबळे आणि प्रसाद रोचकरी (दोघे रा. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ३ मे २०२६) मध्यरात्री १२.१० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जय मेडिकलसमोर ही घटना घडली. मयत कृष्णा रसाळ आणि आरोपी प्रथमेश कांबळे व प्रसाद रोचकरी यांच्यात यापूर्वी काही कारणांवरून भांडण झाले होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी मध्यरात्री आरोपींनी कृष्णाला गाठले. सुरुवातीला त्यांनी कृष्णाला शिवीगाळ केली. त्यानंतर सोबत आणलेल्या तीक्ष्ण हत्याराने कृष्णाच्या गळ्यावर, खांद्यावर आणि पोटावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.
भरचौकात घडलेल्या या घटनेने तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृष्णाचे वडील अनंत महादेव रसाळ (वय ४९, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) यांनी सोमवारी (दि. ४ मे) तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्राथमिक खबरेवरून पोलिसांनी प्रथमेश कांबळे आणि प्रसाद रोचकरी या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१), ११५ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






