तुळजापूर: तुळजापूर शहरातील दीपक चौक परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा आनंत रसाळ (वय १९, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
किरकोळ वादातून घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, २ मेच्या रात्री आणि ३ मेच्या पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक चौक येथे कृष्णा आणि एका अज्ञात व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या या वादाचे रूपांतर अचानक हिंसक घटनेत झाले. रागाच्या भरात अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने (तलवारीने) कृष्णाच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाला वाचवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्याला तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.
पोलीस ठाण्यात मृतदेहासह नातेवाईकांचा आक्रोश
या घटनेनंतर कृष्णाच्या संतप्त नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत त्याचा मृतदेह थेट तुळजापूर पोलीस ठाण्यात आणला. “आधी आरोपीला अटक करा आणि कठोर कारवाई करा,” या मागणीसाठी नातेवाईकांनी तब्बल चार तास पोलीस ठाण्यात आक्रोश करत गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढली आणि आरोपीवर ठोस कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन कृष्णावर अंत्यसंस्कार केले. आई तुळजाभवानीच्या नगरीत घडलेल्या या हत्याकांडाने शहरातील वाढत्या गुंडगिरीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार बालाजी कामतकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होता आणि भांडणाचे मूळ कारण काय होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.








