येरमाळा : कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे बेकायदेशीर जमाव जमवून दोन भावांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तब्बल २० जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक बाबू तोरड (वय ३५) आणि त्यांचा भाऊ भाऊसाहेब बाबू तोरड (दोघे रा. रत्नापूर, ता. कळंब) हे २ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात असताना, आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी अशोक आणि भाऊसाहेब यांना शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. यावेळी मुलांची भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीची आई शालन या तिथे आल्या असता, संतप्त आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अशोक तोरड यांनी ३ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात रामा संपत कांबळे, विशाल भानुदास तोरड, तुषार सतीश कांबळे, कृष्णा रामा कांबळे, हणमा रामा कांबळे, विजय बबन कांबळे, बबन संपा कांबळे, रमेश बाबू कांबळे, भानुदास सोपान तोरड, गीता विशाल तोरड, सुनीता सतीश कांबळे, बमा रामा कांबळे, शिवशाला विठ्ठल तोरड, बायना बप्पा कांबळे, लंका भानुदास तोरड, आप्पा बबन कांबळे, युवराज तोरड, राणी युवराज तोरड, सोमा संपत कांबळे (सर्व रा. रत्नापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.






