“केवळ जाहिरातींचे फलक लावून आणि पोकळ आश्वासने देऊन कोणतंही शहर ‘समृद्ध’ होत नसतं. खऱ्या अर्थाने समृद्धी आणायची असेल, तर तळागाळातील वास्तवाला भिडून काम करावं लागतं.” सध्या धाराशिव (उस्मानाबाद) शहराची आणि जिल्ह्याची अवस्था पाहता, हे वाक्य तंतोतंत लागू पडते. ‘समृद्ध धाराशिव’ हे स्वप्न नक्कीच सुंदर आहे, पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नेमके काय करायला हवे? या वास्तवाचा वेध घेणे आज काळाची गरज बनली आहे.
धाराशिवला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवण्यासाठी खालील प्रमुख आघाड्यांवर युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे:
१. रोजगार आणि औद्योगिक क्रांतीची प्रतीक्षा:
सध्या धाराशिव शहर आणि जिल्ह्यात एकाही मोठ्या कारखान्याची नोंद नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. शहरात आणि तालुकास्तरावरील औद्योगिक वसाहतींमध्ये किमान १००० ते २००० तरुणांना रोजगार देणारा एखादा मोठा उद्योग उभा राहणे काळाची गरज आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली, तर हे अशक्य नक्कीच नाही. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तरच इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि जिल्ह्याचे दारिद्र्य दूर होईल.
२. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुनरुज्जीवन:
कोणत्याही शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा तिथली बाजार समिती असते. शेतकरी जेव्हा आपला माल विकून पैसे मिळवतो, तेव्हा तो त्याच पैशातून शहरातील बाजारपेठेत खरेदी करतो, ज्यामुळे शहराची अर्थव्यवस्था फिरती राहते. मात्र, धाराशिवचा भुसार आडत लाईन बाजार सध्या जवळपास बंदच आहे. बाजार समितीची अवस्था अत्यंत गळितगात्र झाली आहे. जोपर्यंत येथील भुसार मालाच्या आडती पुन्हा गजबजणार नाहीत आणि बाजार समितीमध्ये अमुलाग्र बदल होणार नाही, तोपर्यंत शहराची आर्थिक भरभराट शक्य नाही.
३. मनोरंजन आणि उद्यानांची वानवा:
मोठे उद्योग नसल्याने धाराशिवची अर्थव्यवस्था प्रामुख्याने नोकरदार वर्गावर अवलंबून आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, अनेक नोकरदार इथे राहण्यास उत्सुक नाहीत. ते लातूर किंवा सोलापूरहून ये-जा करणे पसंत करतात. याचे मुख्य कारण म्हणजे, कुटुंबासाठी आणि मुलांसाठी शहरात मनोरंजनाची कोणतीही साधने नाहीत. अकलूजसारख्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी दोन-तीन मोठी उद्याने आहेत, पण जिल्ह्याचे ठिकाण असूनही धाराशिवमध्ये एकही चांगले उद्यान किंवा दर्जेदार सिनेमागृह नाही. असलेल्या एकमेव ‘जिजाऊ उद्याना’ची अवस्था उकिरड्यासारखी झाली आहे, जी नगरपरिषदेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
४. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव:
ज्या शहराला आपण ‘समृद्ध’ म्हणू पाहतोय, तिथे महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह (शौचालय) उपलब्ध नसावे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पुरुषांसाठी असलेल्या मोजक्या मुताऱ्यांची अवस्था एवढी भयानक आहे की, तिथून जाताना नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागतो. स्वच्छतेच्या या बोजवारा उडालेल्या स्थितीत आपण समृद्धीच्या गप्पा कशा मारू शकतो?
५. कोलमडलेली पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापन यंत्रणा:
शहरातील पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. रस्त्याकडच्या नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत, नगरपरिषदेच्या घंटागाड्या आठ-आठ दिवस फिरकत नाहीत आणि मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. शहरात मोकाट कुत्री आणि डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे नागरिकांना सहा दिवसांतून एकदा पाणी मिळते. अशा अस्वच्छ आणि गैरसोयीच्या वातावरणात जगणाऱ्या नागरिकांचे शहर ‘समृद्ध’ कसे असू शकते?
६. रस्त्यांची चाळण आणि आरोग्याचा प्रश्न:
धाराशिव शहरातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट आहे की, खड्डे मोजणाऱ्या ‘गिनीज बुक’मध्येही याची नोंद होऊ शकेल. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्ते उखडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे आणि उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मणक्याचे आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार जडू लागले आहेत. रस्ते हा विकासाचा मार्ग असतो, पण इथे तोच आजारांचा मार्ग बनला आहे.
केवळ नावापुरते ‘समृद्ध धाराशिव’ म्हणून चालणार नाही. जोपर्यंत औद्योगिक वसाहतीत मोठे कारखाने येत नाहीत, बाजार समिती पूर्ण क्षमतेने सुरू होऊन शेतमालाची उलाढाल वाढत नाही, जिजाऊ उद्यानाचा प्रामाणिक विकास होत नाही, खड्डेमुक्त आणि मजबूत रस्ते बांधले जात नाहीत, महिला व पुरुषांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उभारली जात नाहीत, दररोज स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही आणि शहराचे कचरा व्यवस्थापन सुधारत नाही… तोपर्यंत धाराशिव शहराला “समृद्ध धाराशिव” म्हणण्याचा नैतिक अधिकार ना प्रशासनाला आहे, ना राजकीय नेत्यांना, ना आम्हा नागरिकांना!
आता वेळ केवळ चर्चेची नाही, तर धाराशिवच्या विकासासाठी सामूहिक कृती करण्याची आहे.
- धर्मवीर कदम, अध्यक्ष, फूक संघटना, धाराशिव






