धाराशिव – शहरातील इंगळे गल्ली आणि किनारा हॉटेल परिसरात दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, मारहाण आणि दगडफेक करण्यात झाले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, अनेक जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
नेमका प्रकार काय घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन वेगवेगळ्या फिर्यादी (गु.र.नं ३३७/२०२६ आणि ३३८/२०२६) दाखल करण्यात आल्या आहेत.
-
पहिली फिर्याद (नितीन कदम यांची):
मोबाईल विक्रीचा व्यवसाय करणारे नितीन राजकुमार कदम (वय ३९, रा. इंगळे गल्ली) यांच्या दुकानासमोर दोन अनोळखी इसम दारूच्या नशेत आपापसात भांडण करत होते. कदम यांनी त्यांना “भांडण-तंटे करू नका” असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कारणावरून रमजान तांबोळी, अहेमद फकीर शेख, तौसीफ शेख, इस्माईल फैसल शेख आणि इतर काही जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली. तसेच कदम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गु.र.नं ३३७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिघोळे करत आहेत.
-
दुसरी फिर्याद (रमजान तांबोळी यांची):
दुसऱ्या गटाकडून रमजान इस्माईल तांबोळी (वय २९, रा. एम. के. फंक्शन हॉलच्या बाजूला) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, इंगळे गल्ली येथील विघ्नहर्ता मोबाईल शॉपी आणि धारासूर मर्दिनी कमानीजवळून जात असताना, तांबोळी यांनी नितीन कदम यांना “दारुड्या लोकांना मारहाण का करत आहेस?” अशी विचारणा केली. याचा राग आल्याने नितीन कदम, विष्णू गायकवाड, कुमार गायकवाड, प्रमोद जाधव आणि इतर काही जणांनी जमाव जमवून तांबोळी यांना शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दगडफेक करून जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून गु.र.नं ३३८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक होमकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
शहरात दोन गटांत दगडफेक आणि हाणामारी झाल्याची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. स्वतः पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.सध्या परिसरात शांतता असून, पोलीस या दोन्ही घटनांचा सखोल तपास करत आहेत.






