धाराशिव | धाराशिव तालुक्यातील तेरखेडा येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये मंगळवारी रात्री तुफान राडा झाला. या घटनेत दगडफेक करून इनोव्हा, थार, फॉर्च्युनरसह सुमारे 10 ते 12 वाहनांचे नुकसान करण्यात आले. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदुकधारी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
या वादात आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाचा उन्माद सावंत गटाकडून केला जात असून त्यातूनच हा हल्ला झाला. तर सावंत समर्थकांनी हा आरोप फेटाळून लावत, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशामुळे विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनांचे नुकसान करून आमच्यावर आरोप केल्याचा पलटवारही सावंत समर्थकांनी केला.
दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या नसल्याने पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करत 45 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी घोडके यांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे तेरखेडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.






