आमदार राणा पाटील यांच्या एकाधिकारशाही कारभाराविरुद्ध निष्ठावंतांनी रणशिंग फुंकल्यानंतर आता धाराशिव भाजपमधला हा वाद अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. नवा गट विरुद्ध जुना गट अशी उभी फूट पडली असून, सोशल मीडियावर ‘चिखलफेक’ महोत्सवाला उधाण आले आहे. आता या राजकीय नाट्यात नवनवीन पात्रांची आणि रहस्यमयी घडामोडींची एन्ट्री झाली आहे.
दत्ताभाऊंच्या हातातली ‘ती’ रहस्यमयी फाईल आणि ‘शकुनीमामा’ची शोधाशोध!

एकीकडे धाराशिवमध्ये वाद पेटलेला असताना, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना तातडीने मुंबईत पाचारण केले. या भेटीचा एक फोटो दत्ताभाऊंनी सोशल मीडियावर मोठ्या थाटात शेअर केला. पण लोकांचे लक्ष दत्ताभाऊ किंवा प्रदेशाध्यक्षांवर कमी आणि दत्ताभाऊंच्या हातात असलेल्या ‘त्या’ फाईलवर जास्त होते!
“त्या फाईलमध्ये नेमकं दडलंय काय?” असा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्याला पडला आहे. निष्ठावंतांच्या मते, या फाईलमध्ये धाराशिवमध्ये ‘भाजप भवन’ का होत नाही? ते होऊ नये म्हणून कोण काड्या करत आहे? आणि हा संपूर्ण खेळ घडवून आणणारा तो स्थानिक ‘शकुनीमामा’ नेमका कोण आहे? याचीच कुडली त्या फाईलमध्ये असावी!
लेकाचा ‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘माऊली’चा थेट व्हॉट्सॲप ‘अटॅक’!
दुसरीकडे राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील हे ‘आम्ही सारे एक आहोत’ असे दाखवत मैत्री दिनाचे (Friendship Day) रिल्स टाकून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण त्याचवेळी ‘मल्हार पर्व’चे बॅनर लावणारे त्यांचे चमचे मात्र निष्ठावंतांवर यथेच्छ चिखलफेक करत आहेत. हा दुटप्पीपणा सुरू असतानाच, आता या मैदानात थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि राणा पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांची एन्ट्री झाली आहे!

कार्यकर्ते ज्यांना प्रेमाने ‘माऊली’ म्हणतात, त्या माऊलींनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून थेट निष्ठावंतांनाच डिवचले आहे. “लहान तोंडी मोठा घास घेत आहे…” अशी नम्र सुरुवात करत त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा चांगलाच ‘क्लास’ घेतला.
“मागील ३० वर्षांत पक्ष वाढीसाठी तुमचे काय योगदान आहे, हे उदाहरणासह स्पष्ट करा. तुमच्या काळात कधी स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपची सत्ता होती का?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. तसेच, राणा पाटील पक्षात आल्यानंतरच कसा सुकाळ आला, तुळजापूरचा आमदार, ११ पैकी ८ पंचायत समित्या आणि थेट जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता कशी आली, याचे गोडवे गात त्यांनी निष्ठावंतांना गप्प बसण्याचा सल्ला दिला.
निष्ठावंतांचा प्रतिहल्ला: “विजयाचे श्रेय तुमचे, मग पराभवाचे धनी कोण?”
माऊलींच्या या व्हॉट्सॲप स्टेटसनंतर निष्ठावंत कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. “राणा पाटील यांच्यामुळेच धाराशिवमध्ये भाजपला सुगीचे दिवस आले,” असा दावा करणाऱ्यांना निष्ठावंतांनी आता अत्यंत साधे, पण जळजळीत प्रश्न विचारले आहेत:
-
प्रश्न पहिला: जर साहेबांचे इतकेच वर्चस्व आहे, तर मग २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणा पाटील यांचा पराभव कसा झाला?
-
प्रश्न दुसरा: साहेबांची जादू एवढीच भारी होती, तर मग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतः ‘माऊली’ (अर्चना पाटील) यांचा दारुण पराभव ( सव्वा तीन लाखाच्या फरकाने ) का झाला? तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊन देखील.
विजयाचे सगळे श्रेय स्वतःच्या खिशात घालायचे आणि पराभवाचे खापर मात्र निष्ठावंतांच्या किंवा इतरांच्या माथी फोडायचे, हा कसला राजकीय हिशेब? असा सवाल आता जुने कार्यकर्ते विचारत आहेत.
अंतिम आव्हान: करूनच बघा प्रयोग, चार मतदारसंघांत ‘हम दो, हमारे दो’!
या सगळ्या राड्याचा शेवट निष्ठावंतांनी एका भन्नाट आणि थेट आव्हानाने केला आहे. जर खरंच राणा पाटील यांचे जिल्ह्यात इतके प्रचंड राजकीय वजन आहे, आणि त्यांच्याशिवाय पक्षाचे पानही हालत नाही, तर मग सन २०२९ च्या विधानसभेला एक नवा ‘प्रयोग’ करूनच पाहावा!
धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे लढवावेत!
-
एका मतदारसंघातून स्वतः राणा पाटील
-
दुसऱ्यातून सौ. अर्चना पाटील
-
तिसऱ्यातून मल्हार पाटील
-
आणि चौथ्यातून मेघ पाटील!
“उतरा एकदाचे मैदानात! मग जनतेचाच कौल अंतिम ठरेल. कोणाचं ‘खरं वजन’ किती आणि हवेत उडणारे फुगे कोणते, हे ईव्हीएम मशीन आणि मतपेटीच बरोबर सांगेल!” असे थेट आणि आरपारचे ओपन चॅलेंज निष्ठावंतांनी दिले आहे.
आता या ‘फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ या लढाईत हे व्हॉट्सॲप युद्ध आणखी किती रंगणार, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!
घुगी येथे जुन्या वादातून दोन गटात राडा! लोखंडी पाईप अन् सळईने बेदम मारहाण
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!
धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!





