धाराशिव भाजपमधला हा राजकीय ‘बिग बॉस’ आता अशा वळणावर आलाय, जिथे दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ‘माऊली’ अर्थात अर्चना पाटील यांनी “ती पोस्ट टीमने टाकली” असा युटर्न घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा, पण जुन्या निष्ठावंतांनी आता माघार न घेण्याचेच ठरवल्याचे स्पष्ट दिसत आहे. यातच आता माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी अशी एक ‘सूचक’ पोस्ट टाकली आहे, की राणा गटाला अक्षरशः पळता भुई थोडी झाली आहे.
सुजितसिंह ठाकुरांचा ‘तो’ एकच बाण… आणि सगळा टार्गेट क्लिअर!
सोशल मीडियावरील चिखलफेक आणि माऊलींचा खुलासा या सगळ्यानंतर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत, पण थेट वर्मी लागणारा एक बाण सोडला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले:
#भाजपा_धाराशिवभाजपा परिवाराची पार्टी नाही,पार्टी हाच आमचा परिवार!जय भाजपा… तय भाजपा…
या चार ओळींनी धाराशिवच्या राजकारणात जो काही अर्थ दडलाय, तो समजायला कुणा राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. हा थेट आणि उघड हल्ला होता तो ‘राणा पाटील प्रायव्हेट लिमिटेड’वर! “पक्ष म्हणजे तुमच्या घरातली (नवरा-बायको-मुलगा) प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मिळून बनलेला तो एक परिवार आहे,” हा कडक संदेश ठाकूर यांनी अत्यंत शिताफीने दिला आहे. कोणतीही शिवीगाळ न करता, कुणाचेही थेट नाव न घेता काढलेला हा ‘राजकीय चिमटा’ राणा गटाला चांगलाच झोंबला आहे.

टायमिंगचा खेळ: ‘राणे’ धाराशिवमध्ये, अन् ‘राणा’ थेट परदेशात!
इकडे धाराशिवमध्ये ठाकुरांचे बाण सुटत आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्ते तलवारीला धार लावून बसले आहेत, कारण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे हे या सर्व वादाची सुनावणी घेण्यासाठी धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत.
पण या सगळ्यातला सर्वात मोठा ‘क्लायमॅक्स’ काय असेल? तर ज्यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध हे सगळे महाभारत सुरू आहे, ते मुख्य सूत्रधार म्हणजेच आमदार राणा जगजितसिंह पाटील हे धाराशिवमध्ये नाहीत, तर ते थेट परदेशवारीवर गेले आहेत! (कदाचित माऊलींसोबत मुलाच्या पदवीदान सोहळ्यासाठी).
राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे- “इकडे राणे आले दारात, आणि राणा गेले परदेशात!” हायकमांडच्या प्रतिनिधीला सामोरे जाण्याची वेळ आली, तेव्हाच साहेबांनी परदेशवारीचा ‘प्लॅन’ कसा काय आखला? हा निव्वळ योगायोग आहे, की निष्ठावंतांच्या भडक्यातून आणि राणेंच्या प्रश्नांतून स्वतःची सुटका करून घेण्याची ही ‘एक्झिट स्ट्रॅटेजी’ आहे? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
साहेबांची ‘ब्लंडर बँक’ आणि कार्यकर्ते झाले ‘सैरभैर’!
राणा साहेब आणि माऊली परदेशात गेल्यामुळे, इकडे धाराशिवमध्ये त्यांच्या समर्थकांची आणि तथाकथित ‘ब्लंडर बँके’ची अवस्था अक्षरशः ‘बिनधाकऱ्याच्या गुरांसारखी’ झाली आहे. साहेबच जागेवर नसल्यामुळे सुनील राणे यांच्यासमोर बाजू कुणी मांडायची? निष्ठावंतांनी स्क्रीनशॉटच्या ज्या ‘फाईल्स’ तयार ठेवल्या आहेत, त्याला उत्तर कसे द्यायचे? याची कोणतीही रणनीती नसल्याने राणा गटाचे कार्यकर्ते पूर्णपणे ‘सैरभैर’ झाले आहेत.
एकीकडे निष्ठावंत कार्यकर्ते पुराव्यांसहित रायगड फंक्शन हॉलमध्ये गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे राणा गटाचे कार्यकर्ते ‘साहेब कधी परत येणार?’ याची वाट पाहत आहेत.
आता सुनील राणे या ‘सैरभैर’ कार्यकर्त्यांचे काय ऐकून घेणार आणि परदेशात बसलेल्या राणा साहेबांचा रिपोर्ट प्रदेशाध्यक्षांना कसा देणार, याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. एक मात्र नक्की, “राणा गेले परदेशात, पण इकडे भाजपच्या कमळात मात्र चांगलाच काटा रुतलाय!”
(पुढील भागात: सुनील राणेंच्या बैठकीत नेमका काय राडा झाला? वाचा लवकरच!)





