धाराशिव : धाराशिव तालुक्यातील कनगरा आणि धुत्ता येथील शेतकऱ्यांच्या जमिनी व उभ्या पिकांबाबत पवनचक्की कंपनीकडून सुरू असलेल्या कथित मनमानीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पवनचक्की प्रकल्पाच्या कामासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून परस्पर वाहने नेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा योग्य माहिती न देता शेतजमिनीचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, पोलिस प्रशासनाने परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी न करता कंपनीची बाजू घेतल्याचा आणि शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने बैठकीत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या शेतात प्रवेश करणे, उभी पिके उद्ध्वस्त करणे किंवा जमिनीचा वापर करणे याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. कनगरा व धुत्ता येथील नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करावी, जमिनीच्या वापराबाबत चौकशी करावी, कंपनीने केलेल्या कामांची कायदेशीरता तपासावी तसेच पोलिस प्रशासनाच्या भूमिकेचीही सखोल चौकशी करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. पवनचक्की प्रकल्प उभारताना कायद्याच्या चौकटीचे पालन करून शेतकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून वाहने नेऊन प्रकल्पाचे काम करण्यास विरोध असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
कंपनी कितीही मोठी असली तरी ती शेतकऱ्यांच्या हक्कांपेक्षा मोठी नाही. त्यामुळे कंपनीला कायद्यापेक्षा मोठे समजून मनमानी करण्याची मुभा प्रशासनाने देऊ नये, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, आरडीसी कडवकर, एसडीओ देशमुख, एपीआय दहिफळे, नायब तहसीलदार शिंदे यांच्यासह कनगरा व धुत्ता येथील शेतकरी उपस्थित होते.






