धाराशिव: मराठीत एक अत्यंत चपखल म्हण आहे- “दूध पोळलं की माणूस ताकही फुंकून पितो!” धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ‘माऊली’ (अर्चना पाटील) यांची अवस्था सध्या अगदी तशीच झाली आहे. पिंपळा (खुर्द) च्या महादेवासमोर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना ‘मुख्यमंत्री’ करण्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांना ‘राग येईल’ असा जो भन्नाट बाउन्सर त्यांनी टाकला होता, त्याचा धसका त्यांनी इतका घेतला आहे की, आजच्या पत्रकार परिषदेत माऊलींनी सुरुवातीलाच हात जोडून जाहीर केले, “आज मी कोणतेही अनौपचारिक (Informal) बोलणार नाही!”
आपल्याच जिभेवर आपला ताबा नाही, हे लक्षात आल्यावर माऊलींनी घेतलेला हा ‘मौनव्रताचा’ निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे!
प्रेस नोट आधीच पाठवली, पण कॅमेऱ्याची ‘हौस’ काही फिटेना!
खरं तर आजच्या पत्रकार परिषदेत जे काही सांगायचे होते, त्याची अधिकृत ‘प्रेस नोट’ प्रशासनाने अगोदरच सर्व पत्रकारांना पाठवून दिली होती. पण, माऊलींना आठवड्यातून किमान एकदा तरी पत्रकार परिषद घेण्याची आणि कॅमेऱ्यासमोर झळकण्याची जी भारी हौस आहे, ती काही केल्या मिटत नाही.
या पत्रकार परिषदेच्या ‘मालिकां’मधील आणखी एक रहस्य म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती प्रियवंदा महाडदळकर! माऊलींच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत सीईओ मॅडम मोठ्या दिमाखात शेजारी बसल्या होत्या. पण त्यानंतर त्या कधीच कोणत्याही पत्रकार परिषदेत फिरकल्या नाहीत! साहेबांच्या गाड्या, मोक्याच्या जागांचे बीओटी (BOT) टेंडर आणि माऊलींच्या अजब घोषणा, या सगळ्याला कंटाळून सीईओ मॅडमनी स्वतःच ‘अंतर’ ठेवले की माऊलींनी त्यांना डावलले? याचे उत्तर फक्त माऊलींनाच माहीत!
पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप!
आजच्या पत्रकार परिषदेतील सर्वात मोठा विनोद माऊली नव्हत्या, तर समोर बसलेले ‘पत्रकार’ होते!
-
काही दिवसांपूर्वीच माऊलींनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ उडाली होती.
-
आज पत्रकार माऊलींना थेट गाठून त्या विधानाबद्दल भंडावून सोडतील, अशी जनतेची अपेक्षा होती.
-
पण आश्चर्य! एकाही पत्रकाराने त्या वादग्रस्त विधानाबाबत ‘ब्र’ शब्दही काढला नाही!
यामागील ‘इनसाईड स्टोरी’ काय?
माऊलींनी आणि झेडपीने येत्या काही दिवसांत ‘आपला जीव धाराशिव’ अंतर्गत काही मोठे इव्हेंट आणि कार्यक्रम आखले आहेत. या इव्हेंट्सच्या निमित्ताने सर्व वृत्तपत्रांना आणि चॅनेल्सना ‘भरघोस जाहिराती’ मिळणार आहेत. आता जाहिरातींची (आणि लक्ष्मीची) कृपा होणार म्हटल्यावर माऊलींना कठीण प्रश्न विचारून पंगा कोण घेणार? त्यामुळेच पत्रकारांनी आज स्वतःच्याच तोंडाला जाहिरातींचे कुलूप लावून घेत माऊलींच्या ‘भन्नाट स्कीम’चे कौतुक करणेच पसंत केले.
माऊलींची ‘भन्नाट स्कीम’: प्रस्तावामागे १,००० रुपयांचे बक्षीस!
वादग्रस्त विधानांवरून लक्ष हटवण्यासाठी माऊलींनी आज एक अभिनव उपक्रमाची घोषणा केली.
काय आहे ही योजना?
-
उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या ‘समुदाय संसाधन व्यक्तींवर’ (CRP) आता मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे.
-
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ४ ते ५ महिलांची निवड करून त्यांना मुख्यमंत्री/प्रधानमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग उभारण्यासाठी या CRP मार्गदर्शन करतील.
-
या उपक्रमाला ‘प्रभावी’ करण्यासाठी, प्रत्येक मंजूर प्रस्तावामागे समुदाय संसाधन व्यक्तींना झेडपीमार्फत १,००० रुपयांचे प्रोत्साहनपर मानधन (Incentive) दिले जाईल!
आधी स्थायी समिती, मग घोषणा! (पण इथे सगळंच ‘उलटं’!)
आज माऊलींनी या योजनेची मोठी घोषणा केली आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींकडून टाळ्याही मिळवल्या. पण, मजेची गोष्ट अशी की, या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेलाच नाही! हा निर्णय ‘स्थायी समितीच्या’ आगामी बैठकीत घेतला जाणार असल्याचे माऊलींनी शेवटी हळूच सांगितले.
म्हणजेच, आधी स्थायी समितीत ठराव मंजूर करायचा आणि मग घोषणा करायची, हा लोकशाहीचा साधा नियमही इथे पाळला जात नाही. “मीच झेडपी, मीच स्थायी समिती आणि मीच सत्ता!” या थाटात घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली जोरात सुरू आहे.
सध्यातरी, १ हजारांच्या या नव्या स्कीमने पत्रकारांची तोंडे बंद करण्यात आणि वादग्रस्त विधानांवर पडदा टाकण्यात माऊली यशस्वी झाल्या आहेत, हे मात्र नक्की!





