तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाका परिसरातील गाळाधारक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉल, दूध विक्रेते व स्नॅक्स सेंटर चालकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या प्रशासकीय कारवाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रस्तावित कारवाईच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तामलवाडी टोलनाका परिसरात शांततामय व लोकशाही मार्गाने धडक निषेध आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाठीमागेच शेती; व्यवसायावर कुटुंबांची उपजीविका
तामलवाडी टोलनाका परिसरात अनेक वर्षांपासून विविध लहान-मोठे व्यावसायिक दुकाने थाटून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत आहेत. विशेष बाब म्हणजे, बहुतांश व्यावसायिक हे स्वतः स्थानिक शेतकरी असून त्यांच्या व्यवसायाच्या जागेच्या अगदी पाठीमागेच त्यांची शेती आहे. अचानक अतिक्रमणाच्या नावाखाली ही दुकाने आणि हॉटेल्स हटवल्यास डझनावारी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल आणि त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत काँग्रेसने कारवाईला कडाडून विरोध दर्शवला.
पालकमंत्र्यांचा वैयक्तिक विषय वेगळा, पण गरीबांच्या पोटावर पाय नको: काँग्रेसची ठाम भूमिका
यावेळी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जमिनीच्या वादावरही रोखठोक भूमिका मांडण्यात आली. “पालकमंत्र्यांनी त्या भागात जमीन खरेदी केली असून, त्यावर शेती करणे, फळबाग फुलवणे किंवा रिसॉर्ट उभारणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र, स्वतःच्या सोयीसाठी गोरगरीब स्थानिकांच्या रोजगाराचे साधन असलेली दुकाने व व्यवसायाची ठिकाणे पाडणे अत्यंत चुकीचे आहे,” असा घणाघात काँग्रेस नेत्यांनी केला. स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार व उपजीविका अबाधित ठेवूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या धडक आंदोलनात स्थानिक शेतकरी, गाळाधारक व व्यापाऱ्यांसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, धीरज पाटील, धनंजय राऊत, शिवाजी गायकवाड, अरविंद बेडगे, अमोल कुतवळ, दिलीप भोकरे, सयाजी देशमुख, राजेंद्र शेंडगे, गौरीशंकर मुळे, अझहर (नगरसेवक), गोपाळ सुरवसे, हणमंत गवळी, दादासाहेब चौधरी, सिद्धेश्वर अण्णा कस्तुरे, सुनील माळी, सत्तार मुलाणी, गोविंद डोंगरे, डॉ. पंकज घुगे, पोपट मोटे, उत्तम दादा पाटील, संजय गुंजूटे, तुकाराम नवगिरे, ज्ञानेश्वर जगताप, सुमन नवगिरे, विकास वडणे, दीपक वडणे, अश्विनकुमार आतकरे, जुबेर शेख, संदीप सुरवसे, पेंदे, सौ. वाघे ताई शिंदे, भीमा रणसुरे, दादाराव नेटके, हरिदास घोटकर, निजाम शेख, तानाजी नेटके आणि बाळासाहेब गायकवाड यांच्यासह तुळजापूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोपर्यंत स्थानिक व्यावसायिकांना पूर्ण न्याय मिळत नाही आणि त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा ठाम निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.




