धाराशिवच्या राजकारणात ‘ऑपरेशन लोटस’ फेल झाले आणि ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ कसे सक्सेस झाले, याची चुरचुरीत स्टोरी आपण वाचलीच असेल. पण थांबा! हा पिक्चर इथंच संपलेला नाही, खरा ‘क्लायमॅक्स’ आणि कायदेशीर खेळ तर आता कुठं सुरू होणार आहे! चार नगरसेवक पळवून शिंदे गटाने तात्पुरती बाजी मारली असली, तरी आता या नगरसेवकांच्या डोक्यावर ‘अपात्रतेची (Disqualification) टांगती तलवार’ लटकू लागली आहे. आणि या सगळ्यात सर्वात मोठी कॉमेडी म्हणजे, ज्याच्या हातात ही तलवार आहे, तोच गायब आहे!
गणिताचा घोळ: ५ जण लागतात, पण गळाला लागले ४ च!
कायद्याच्या भाषेत सांगायचे तर, ‘पक्षांतर बंदी कायद्यानुसार’ (Anti-Defection Law) जर कारवाई टाळायची असेल, तर एकूण संख्येच्या दोन तृतीयांश (2/3) सदस्यांनी गट सोडणे आवश्यक असते. धाराशिव नगरपालिकेत ठाकरे गटाचे एकूण ७ नगरसेवक होते. यापैकी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात गेलेत फक्त ४! म्हणजे कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांना अजून एका (५ व्या) नगरसेवकाची नितांत गरज आहे.
पण हा ५ वा नगरसेवक आहे कुठे? तर हा पठ्ठ्या अधिकृतपणे भाजपमध्ये गेला नसला, तरी तो सध्या थेट भाजप आमदार राणा पाटलांच्या बंगल्यावर चहापाणी घेत असल्याचं (आणि तिथूनच सूत्रे हलवत असल्याचं) दिसत आहे! शिंदे सेनेचा गळ लागलाय, पण पाचवा मासा मात्र भाजपच्या तंबूत जाऊन बसलाय.
ठाकरे गटाची कोंडी: ‘व्हीप’ वाजवणार कोण?
इकडे उद्धव ठाकरे गटाने (उबाठा) जाहीर करून टाकले आहे की, “शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या या ४ गद्दारांना आम्ही अपात्र ठरवण्यासाठी थेट कोर्टात जाणार!” पण इथंच खरी गोम आणि राजकारणाची सर्वात मोठी गंमत दडली आहे!
कोर्टात जाऊन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी पक्षाचा अधिकृत ‘व्हीप’ (प्रतोद/गटनेता) काढावा लागतो. आणि पालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्याचा कायदेशीर अधिकार कोणाकडे आहे? तर तोच ५ वा नगरसेवक, जो सध्या साहेबांच्या (भाजपच्या) बंगल्यावर आश्रयाला गेला आहे!
म्हणजेच, ज्या ४ जणांवर कारवाई करायची आहे, त्यांच्यावर कारवाईचा आसूड ओढणारा ‘गटनेता’ चक्क ठाकरेंचा शत्रू असलेल्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसला आहे! आता हा गटनेता नेमका कोणाचा आदेश पाळणार?
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र? नवा डाव शिजतोय!
आता राजकीय वर्तुळात भन्नाट तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या मते, शिंदे सेनेत गेलेल्या या ४ जणांचा बदला घेण्यासाठी, भाजप म्हणजे भावी खासदार मल्हार पाटील आता एक डेंजरस ‘गेम’ करणार आहे.
साहेबांच्या ‘बंगल्यावर बसलेल्या’ ठाकरे गटाच्या गटनेत्याला उबाठा पक्षातच ठेवून, त्याच्याकडून शिंदे गटात गेलेल्या ‘त्या’ ४ नगरसेवकांविरुद्ध ‘व्हीप’ वाजवण्यास सांगणार असल्याची दाट शक्यता आहे! म्हणजेच, साहेबांचे (राणा पाटलांचे) ‘ऑपरेशन लोटस’ फेल करणाऱ्या या ४ नगरसेवकांचा काटा काढण्यासाठी, भावी खासदार करामत करू शकतात, पण खासदार ओमराजे देखील कच्चा गुरुचे चेले नसल्याने ते यावेळी काय करतात, याकडे लक्ष वेधले आहे
पुढे काय? पिक्चर अभी बाकी है!
थोडक्यात सांगायचे तर, धाराशिव पालिकेचा हा तिढा आता एवढा गुंतागुंतीचा झालाय की, भल्याभल्या घटनातज्ज्ञांनाही यातून मार्ग काढताना घाम फुटेल!
-
शिंदे गट ५ वा नगरसेवक फोडून स्वतःला वाचवणार?
-
की साहेबांच्या बंगल्यावर बसलेला गटनेता भावी खासदारांच्या इशाऱ्यावर व्हीप काढून या ४ जणांचा बळी घेणार?
-
की या सगळ्या राजकारणात ठाकरे गट आपला वेगळाच डाव साधणार?
आगामी काळात कोर्टात आणि पालिकेत अशा काही नाट्यपूर्ण आणि थरारक घडामोडी घडणार आहेत, ज्याने धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप येईल. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून पाहत राहा, कारण इथं कधीही, काहीही होऊ शकतं!





