धाराशिव: आपल्या धाराशिव झेडपीच्या अध्यक्षा ‘माऊली’ (अर्चना पाटील) म्हणजे राजकारणातील एक चालती-बोलती ‘एंटरटेनमेंट एक्सप्रेस’ आहेत! त्या कधी, कुठे आणि काय बोलतील, याचा नेम खुद्द ब्रह्मदेवालाही लावता येणार नाही. त्यांच्या एका वाक्याने राजकीय भूकंप येऊ शकतो आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड कशी मारून घ्यावी, याचे त्या चालते-बोलते विद्यापीठ आहेत!
माऊलींची ‘गोल्डन’ मुक्ताफळे: एक फ्लॅशबॅक!
मागे माध्यमांशी बोलताना त्यांनी अशी काही मुक्ताफळे उधळली की अख्खा महाराष्ट्र हादरला होता:
-
“मी कुठेही खात नाही, खायला भरपूर जागा आहेत…” (त्या खायच्या जागा झेडपीत अजून शोधल्या जात आहेत).
-
विरोधक आणि दीर ओमराजे निंबाळकर यांना टोमणा मारण्याच्या नादात थेट स्वतःच्या नवऱ्यालाच टार्गेट केले: “मी काय खोडा घालायला राणा दादा आहे का?” (चूक असली तरी जनतेला त्यात ‘सत्य’ दिसले!).
-
त्यानंतर भाजपच्या जुन्या-नव्या वादात “धाराशिवमध्ये राणा दादांमुळेच भाजप जिवंत आहे” अशी वल्गना केली आणि अंगलट आल्यावर बिचाऱ्या सोशल मीडिया टीमच्या माथी खापर फोडून सोयीस्कर ‘यू-टर्न’ घेतला.
पिंपळा (खुर्द) मध्ये फुटला नवा ‘बॉम्ब’!
आता १४ ऑगस्ट रोजी माऊलींनी असा एक अजब दावा केला आहे की, धाराशिवची जनताच काय, पण देवही डोक्याला हात लावून बसले असतील!
निमित्त होते तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील शंभू महादेव देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभाचे भूमिपूजन. प्रमुख पाहुणे होते पालकमंत्री प्रताप सरनाईक! (लक्षात घ्या, झेडपीत भाजप-शिंदे गटाची युती आहे आणि माऊलींची खुर्ची याच शिंदे गटाच्या पाठबळावर टिकून आहे). सरनाईकांनीही खूश होऊन मंदिरासाठी ११ लाखांची वैयक्तिक देणगी जाहीर केली.
इथे माऊलींचा माईकचा ताबा मिळाला आणि त्यांनी थेट भविष्यवाणीच केली! त्या म्हणाल्या, “पिंपळा (खुर्द) येथील शंभू महादेव अत्यंत जागृत आहे.. इथले दर्शन घेतल्यानंतर राजकीय नेता थेट ‘मुख्यमंत्री’ होतो!”
सरनाईक सुखावले, फडणवीसांना ‘टेन्शन’!
पुढे माऊलींनी त्यात आणखी एक ‘तडका’ मारला. त्या म्हणाल्या, “हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटेल, पण…”
हे ऐकून पालकमंत्री सरनाईक मात्र भलतेच सुखावले! कारण एकनाथ शिंदेंनंतर महायुतीत आपणच मुख्यमंत्री होणार, या कल्पनेने त्यांच्याही मनात लाडू फुटले असतील.
पण, माऊलींनी हा मुख्यमंत्रीपदाचा नवस सरनाईकांसाठी बोलून दाखवला की स्वतःचे पती राणा पाटील यांच्यासाठी, हे मात्र त्या शंभू महादेवालाच ठाऊक! सध्या श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे समोर बसलेली जनता फक्त एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होती.
राणा दादा संभाजीनगरला, माऊली इकडे खुर्चीला सुरुंग लावण्यात मग्न!
यातील सर्वात मोठा विरोधाभास आणि विनोद पहा! इकडे माऊली सरनाईकांना (किंवा नवऱ्याला) मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने दाखवत होत्या आणि देवेंद्र फडणवीसांना वाईट वाटेल असे जाहीरपणे सांगत होत्या; तर नेमक्या त्याच दिवशी (१४ ऑगस्ट) त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेत म्हणून त्यांच्या दिमतीला हजर होते! इकडे दादा फडणवीसांची मर्जी राखत होते, आणि तिकडे माऊली त्यांच्याच रागाला आमंत्रण देत होत्या.
२०२४ ची पुनरावृत्ती: ‘नेरुळ’ची रिटर्न तिकीट कन्फर्म?
माऊलींचा ‘पॉलिटिकल सेन्स’ किती भन्नाट आहे, हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याने पाहिले. नवरा भाजपमध्ये आणि माऊली राष्ट्रवादीच्या (अजित पवार) चिन्हावर! बार्शीत जाऊन जाहीर सभेत विचारले, “मी कशाला राष्ट्रवादी वाढवू?” आणि याचा परिणाम असा झाला की, जनतेने त्यांना तब्बल सव्वा तीन लाख मतांनी घरी बसवले.
दीर आणि खासदार ओमराजे निंबाळकर मोठ्या फरकाने विजयी झाले. आता ओमराजे ठाकरे गट सोडून थेट शिंदे सेनेत आल्याने राणा पाटील आणि माऊलींची धाराशिवमधील एकाधिकारशाही पार मोडीत निघाली आहे. अशातच, माऊलींची ही रोजची नवी अजब वक्तव्ये पाहता, त्या लवकरच स्वतःच्याच हाताने राणा पाटील यांचे राजकीय ‘पार्सल’ पुन्हा नेरुळला (नवी मुंबई) पाठवण्याची जय्यत तयारी करत आहेत, अशीच चर्चा आता धाराशिवच्या राजकीय कट्ट्यांवर रंगत आहे!





