धाराशिव : सोशल मीडिया हा फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी किंवा प्रचारासाठी नसतो, तर इथली पब्लिक कधीही तुमचं ‘डिजिटल ऑडिट’ करू शकते, याचा चांगलाच प्रत्यय धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना आला आहे. निमित्त होतं, यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेचं!
नेमका प्रकार काय?
जिल्हाधिकारी पुजार यांनी प्रशासनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. यात त्यांनी नागरिकांना यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. प्रशासनाला वाटलं, व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि ‘ग्रेट वर्क सर’ अशा कमेंट्स येतील. पण घडलं भलतंच! धाराशिवच्या जागरूक नेटकऱ्यांनी थेट प्रश्नांच्या फैरी झाडत प्रशासनाला घाम फोडला.
“साहेब, यंदा झाडे लावण्याचं आवाहन ठीक आहे, पण आधी हे सांगा की गेल्या वर्षी लावलेली किती झाडे जिवंत आहेत?” असा थेट सवाल कमेंट बॉक्समध्ये विचारून नेटकऱ्यांनी प्रशासनाचा ‘सॉफ्टवेअर अपडेट’ केला. यावरून हे स्पष्ट झालंय की, धाराशिवच्या जनतेचं प्रशासनाच्या कामावर अगदी बारकाईने लक्ष आहे.
खड्डे तेच, झाडे मात्र नवी! (पारा गावचा अजब कारभार)
नेटकऱ्यांचा संताप काही उगाच नाहीये. प्रशासनाकडून वृक्षारोपणावर अफाट खर्च केला जातो, पण झाडे जगवण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतं ही वस्तुस्थिती आहे.
- वाशी तालुक्यातील ‘पारा’ गावात गेल्या वर्षी तब्बल ३,७०० झाडे लावण्यात आली होती.
- आता धक्कादायक बाब म्हणजे, यंदाही नेमक्या त्याच खड्ड्यांमध्ये पुन्हा नवीन झाडे लावली जाणार आहेत!
- ‘खड्डे तेच आणि झाडे नवी’ या प्रशासनाच्या अजब कारभाराचे वाभाडे आता निघत आहेत.
सोशल मीडियावर नुसती हवा करण्यापेक्षा, वास्तवात झाडे जगवा,” असाच खणखणीत मेसेज धाराशिवकर या निमित्ताने देत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा दावा विरुद्ध नेटकऱ्यांचा सवाल
एकीकडे इन्स्टाग्रामवर जनतेच्या प्रश्नांचा पाऊस पडत असतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत वृक्ष लागवड मोहिमेबद्दल बोलताना एक मोठा दावा केला. “गेल्या वर्षी लावलेली ७० टक्के झाडे जिवंत आहेत,” असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.
आता लक्ष उत्तराकडे!
जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रकार परिषदेत कागदावरचा ७० टक्क्यांचा आकडा तर सांगितला, पण सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून जनतेने जो आरसा दाखवलाय, त्याचं काय? नेटकऱ्यांच्या या थेट आणि टोकदार प्रश्नांना प्रशासन खरंच उत्तर देणार का? की ‘पुढचं पाठ आणि मागचं सपाट’ या म्हणीप्रमाणे यंदाही फक्त जुनेच खड्डे नव्या झाडांनी भरण्याचं काम होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
View this post on Instagram






