धाराशिव: महाराष्ट्र दिनानिमित्त धाराशिव दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरपालिकेच्या कारभारावरून आणि भगव्या ध्वजाच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यावर घोंघावत असलेल्या संभाव्य दुष्काळ आणि पाणी-चारा टंचाईसारख्या अत्यंत गंभीर व ज्वलंत प्रश्नाकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने बैठकीनंतर तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
भगवा ध्वज आणि अपूर्ण कामांवरून अधिकाऱ्यांना जाब
बैठकीच्या सुरुवातीला नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना भगव्या ध्वजाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. “शहरात भगवा ध्वज लावण्यास नेमका कोणाचा विरोध आहे?” असा संतप्त सवाल करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना फैलावर घेतले. यावेळी आमदार कैलास पाटील यांनीही अपूर्ण विकासकामे आणि बिलांवरून अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अपूर्ण कामे असताना बिले कशी काढली गेली, असा जाब विचारत या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
दुष्काळाच्या मुद्द्यावर आमदारांची मागणी, मात्र पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष
बैठकीच्या शेवटी आमदार कैलास पाटील यांनी ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. हवामान विभागाने मान्सून उशिरा येण्याची शक्यता वर्तवली असल्याने, जिल्ह्यात चारा व पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सज्ज राहून तातडीने उपाययोजना आखावी, अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
टंचाईवर चर्चा नाही, पर्यटन सादरीकरणाला प्राधान्य
आमदार पाटील यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे मात्र पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. पाणी आणि चारा टंचाईवर ठोस चर्चा करण्याऐवजी, पालकमंत्री सरनाईक यांनी पर्यटन विकासासंदर्भातील सादरीकरणाला अधिक प्राधान्य दिले. खाजगी कन्सल्टंटकडून पर्यटन प्रकल्पांची ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ पाहण्यातच बैठकीतील अधिक वेळ खर्च करण्यात आला. परिणामी, जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या पाणी व चारा टंचाईच्या विषयावर कोणतीही ठोस चर्चा होऊ शकली नाही.
पाण्याची भीषण स्थिती: साठा अवघ्या ३२ टक्क्यांवर
सध्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व जलाशयांमध्ये सरासरी केवळ ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वेगाने वाढत असून, मे अखेरपर्यंत हा पाणीसाठा २० टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर, जून अखेरीस तो केवळ ८ ते १० टक्क्यांपर्यंत घटण्याचा भीषण अंदाज आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाणी व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह
अशा गंभीर परिस्थितीत जलव्यवस्थापन, चारा छावण्या आणि पर्यायी पाणीपुरवठा यांसारख्या तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, आजच्या बैठकीत या बाबींचा विचारच न झाल्याने भविष्यातील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक लवकर होण्याची शक्यता नसल्याने, आजच योग्य नियोजन झाले असते तर संभाव्य टंचाईला प्रभावीपणे सामोरे जाता आले असते, अशी भावना आता व्यक्त होत आहे. आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या विनंतीकडे झालेले दुर्लक्ष पाहता, प्रशासनाच्या व पालकमंत्र्यांच्या प्राधान्यक्रमांवरच आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.






