धाराशिव – धाराशिव शहरातील सुनील प्लाझा बिल्डिंगमधील ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीवर शनिवारी सायंकाळी पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून व 4 किलो 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख १ लाख ४० हजार असा १ कोटी ८७ लाखाचा ऐवज लुटला म्हणे. हे पाच दरोडेखोरांनी ज्योती क्रांती मध्ये ५ वाजून ३८ मिनिटांनी प्रवेश केला आणि ५ वाजून ४४ मिनिटांनी पोबारा केला. अवघ्या सहा मिनिटात १ कोटी ८७ लाखाची चोरी झालीच कशी ? असा प्रश्न धाराशिवकरांना पडला आहे.
दि.23.12.2023 रोजी 17.38 वा. सु. ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव मध्ये पाच अनोळखी इसमांनी येवून रिव्हालवर व चाकुचा धाक दाखवून ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मधील रोख रक्कम 1,40,000₹, दोन मोबाईल, 6,000 ₹ व 4 किलो 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 1, 85, 68, 000 ₹ असा एकुण 1, 87, 14, 000 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- फिर्यादी नामे- सतीश अनिरुध्द फुटाणे, वय 37 वर्षे, व्यवसाय- कॅशीअर ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पाच दरोडेखोर येतात, व्यवस्थापक सतीश फुटाणे यांना पिस्तूल दाखवतात आणि चार किलो सोने आणि १ लाख ४० हजार रुपये शांतपणे घेऊन जातात, हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असला तरी हा प्रकार दरोड्याचा वाटतच नाही.गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार लपवण्यासाठी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा बनाव तर केला नाही ना ? अशी शंका वाटत आहे.
सुरुवातीला ५१ तोळे सोने गेले सांगणारे पतसंस्था कर्मचारी आता चार किलो सोने होते म्हणून सांगत आहेत. इतके सोने आले कुठून ? कोटींचा माल होता तर सुरक्षा रक्षक का ठेवला नाही ? दरोडेखोर आल्यानंतर आरडाओरड का केली नाही किंवा गेल्यानंतर आरडाओरड का केली नाही ? पिस्तूल लावल्यानंतर घाबरलेला किंवा भेदरलेला चेहरा वाटत नाही, तसेच सोने ठेवण्यासाठी तिजोरी होती का ? मग अलार्म का वाजला नाही , असे एक ना अनेक प्रश्न आहेत. एकंदरीत प्रकार बेबनाव वाटत आहे. सब गोलमाल है अशी चर्चा सुरु आहे. ही छोटी बँक लोकांकडून सोने तारण घेऊन कर्ज देते. लोकांचे सोने हडप करण्यासाठी संगनमताने कुंभांड रचण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
एरव्ही पोलीस सोने चोरीची फिर्याद घेताना पावतीची विचारणा करतात , मग पतसंस्थेवला कोणता पुरावा मागितला ? पोलीसांचे हात ओले झाले का ? अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे. फिर्यादीच आरोपी निघण्याची शक्यता यानिमित्त व्यक्त केली जात आहे.