या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीकडून भाजपचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख हे समोरासमोर ठाकले आहेत. एकेकाळी राजकीय ‘गुरू-शिष्य’ राहिलेल्या या दोन नेत्यांमध्येच आता मुख्य लढत होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
शेवटच्या १५ मिनिटांत नाट्यमय घडामोडी; बंडोबा थंड!
गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक प्रचंड चर्चेत राहिली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कळंबचे माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा व धाराशिवचे नगरसेवक सचिन पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेले प्रयत्न सुरुवातीला निष्फळ ठरताना दिसत होते. मात्र, अर्ज माघारीची वेळ संपायला अवघी १५ मिनिटे शिल्लक असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांनी बंडखोरांची समजूत काढून त्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणले आणि अगदी शेवटच्या क्षणी हे बंड थंड करण्यात यश मिळवले. याशिवाय तुळजापूरच्या माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गगणे व मिलिंद महालिंगे यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
या उमेदवारांनी घेतली माघार: मिलिंद महालिंगे, अर्चना गगणे, शरद यादव, अहमद राज सय्यद, संजय मुंदडा, सचिन पवार आणि सहाल बिन चारुस यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
आखाड्यात ‘गुरू-शिष्या’ची जुगलबंदी
या निवडणुकीतील सर्वात रंजक बाब म्हणजे, महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही प्रमुख उमेदवार एकाच तालुक्यातील आहेत. माजी मंत्री बसवराज पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते असताना महेश देशमुख हे त्यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर कार्यकर्ते मानले जायचे. मात्र, आता बसवराज पाटील यांनी भाजपची वाट धरल्याने, एकेकाळचे हे राजकीय गुरू-शिष्य आता विधान परिषदेच्या आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.
चार टर्मनंतर धाराशिवला संधी
गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व इतर जिल्ह्यांतील नेत्यांना मिळत होते. यामध्ये माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी तीन वेळा तर सुरेश धस यांनी एकवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातीलच उमेदवारी मिळावी, अशी दोन्ही आघाड्यांमधील स्थानिक कार्यकर्त्यांची प्रबळ मागणी होती. तब्बल चार टर्मनंतर प्रमुख दोन्ही पक्षांनी धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांनाच विधान परिषदेची संधी दिली आहे.
आकड्यांचा खेळ अन् धाराशिवचे महत्त्व
बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे सध्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील मतदारांची भूमिका विजयासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यातही धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक संस्थांवर महायुतीची एकहाती सत्ता आहे, तर दुसरीकडे लातूरमध्ये मनपा व औसा वगळता महायुतीची सरशी आहे. विजयासाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मतदारांची भूमिकाच निर्णायक आणि खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’ ठरणार आहे.






