धाराशिव भाजपमध्ये सध्या एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज होत आहेत. एकीकडे आमदार राणा पाटील आणि ‘माऊली’ (अर्चना पाटील) यांच्या घराणेशाहीविरुद्ध जुन्या निष्ठावंतांनी राळ उडवून दिली असतानाच, आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) रणांगणात नवा स्फोट झाला आहे. साहेबांच्या ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने असा काही निर्णय घेतलाय की, निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांनी थेट विचारलंय— “पक्षासाठी सतरंज्या आम्ही उचलायच्या आणि मलिदा मात्र ‘तेरणा’वाल्यांनी खायचा?”
नवा निकष: “तेरणा युथ फाउंडेशनचे काम करा आणि भाजपचे अध्यक्षपद मिळवा!”

भाजपमध्ये अनेक वर्षांपासून निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणारे, पक्षासाठी आंदोलनात लाठ्या-काठ्या खाणारे असंख्य कार्यकर्ते या जिल्हाध्यक्ष पदाकडे डोळे लावून बसले होते. पण साहेबांच्या दरबारात पक्षातील निष्ठेला कवडीचीही किंमत उरली नाहीये!
पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून थेट साहेबांच्या ‘तेरणा युथ फाउंडेशन’ मध्ये राबणाऱ्या व्यक्तीची (गणेश इंगळगी) भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. यामुळे रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. “भाजप युवा मोर्चासाठी अनेक वर्षे घाम गाळणारे कार्यकर्ते गेले कुठे? तेरणा युथ फाउंडेशनचे काम करणं हाच अध्यक्षपदाचा नवा निकष आहे का?” असा सवाल आता जाहीरपणे विचारला जात आहे.
‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन; काकडेंची केविलवाणी सारवासारव!

या निवडीमागे घराण्यातलीच एक वेगळी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सुरू आहे.
-
जुने अध्यक्ष (राहुल काकडे): हे राणा पाटलांचे मोठे चिरंजीव म्हणजेच ‘बडे सरकार’ मल्हार पाटील (भावी खासदार) यांचे कट्टर समर्थक!
-
नवे अध्यक्ष (गणेश इंगळगी): हे राणा पाटलांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच ‘छोटे सरकार’ मेघ पाटील यांचे कट्टर समर्थक!
थोडक्यात काय, तर ‘मल्हार पर्व’ संपवून आता ‘मेघ पर्व’ सुरू करण्याचा हा डाव आहे. पण यात बिचाऱ्या राहुल काकडेंची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी झाल्यानंतर ते पत्रकारांसमोर केविलवाणा चेहरा करून सांगत आहेत- “मी नाराज नाही हो… मला माझ्या कामाचा खूप व्याप आहे!” पण त्यांच्या चेहऱ्यावरचे वाजलेले १२ आणि स्पष्ट दिसणारी नाराजी लपून राहिलेली नाही.
मराठा कार्ड अन् सुरज शेरकरांचा उघड ‘बाऊन्सर’!
या निवडीवरून आता जातीपातीचे राजकारणही तापले आहे. भाजयुमोचे शहराध्यक्ष सुरज शेरकर यांनी तर थेट बंडाचे निशाण फडकवत साहेबांना उघड चॅलेंज दिले आहे.
शेरकर यांनी थेट बाऊन्सर टाकत म्हटले, “ही निवड अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे. या प्रक्रियेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. ना कुणाच्या मुलाखती, ना कुठली बैठक! ही निवड नेमक्या कोणत्या निकषांवर झाली?”
“आम्ही पक्षनिष्ठ आहोत, पण चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणे आमचे कर्तव्य आहे,” असा सणसणीत इशाराही शेरकर यांनी दिला आहे. ‘पार्टी म्हणजे साहेबांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही,’ हेच या युवा नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे.
फादर बॉडीचे ‘दत्ताभाऊ’ आणि ६ महिन्यांत ३ अध्यक्ष!
या सगळ्यात सर्वात मोठी कॉमेडी सुरू आहे ती फादर बॉडीचे (मुख्य पक्षाचे) जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची! दत्ताभाऊ हे राणा पाटलांच्या इशाऱ्यावर चालणारा ‘रिमोट कंट्रोल’ बनले आहेत.
-
सहा महिन्यांपूर्वी साहेबांच्या सांगण्यावरून दत्ताभाऊंनी एकाच जिल्ह्यात दोन भाजयुमो अध्यक्ष (राहुल काकडे आणि प्रतीक रोचकरी) नेमण्याचा ‘विक्रम’ केला.
-
त्यानंतर काहीच दिवसांत या दोघांनाही पदावरून हाकलून लावले!
-
आणि आता थेट तिसरा अध्यक्ष (गणेश इंगळगी) आणून बसवला.
एकाच पदासाठी ६ महिन्यांत ३ अध्यक्ष! हा विक्रम तर गिनीज बुकमध्ये नोंदवण्यासारखा आहे.
भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
सहा महिन्यांत ३ अध्यक्ष, कार्यकर्त्यांपेक्षा ‘तेरणा’च्या नोकरांना प्राधान्य, आणि मराठा समाजाला डावलल्याची भावना… यामुळे “भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय?” असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
जेव्हा एखादा पक्ष खूप मोठा होतो आणि सत्तेची हवा डोक्यात जाते, तेव्हा हायकमांडचे निर्णय कसे चुकतात आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा लाव्हारस कसा खदखदतो, याचे ‘धाराशिव भाजप’ हे आता एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण बनले आहे!
(पुढील भागात: आणखी बरेच काही )





