धाराशिव भाजपमधला ‘जुना विरुद्ध नवा’ हा वाद थांबण्याचे नाव घेत नसतानाच, साहेबांच्या (आमदार राणा पाटील) ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने एक नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे! जुन्या निष्ठावंतांच्या बंडावरून हायकमांडचे लक्ष वळवण्यासाठी साहेबांनी आता थेट कळंब नगरपालिकेत ‘ऑपरेशन लोटस’ राबवले आहे. पण या ‘कमळ-खरेदी’च्या खेळात जे किस्से बाहेर येत आहेत, ते ऐकून भल्याभल्यांना चक्रर यायला लागली आहे!
‘पतीदेवा’च्या आज्ञेने निष्ठेला राम-राम अन् कमळ हातात!
झाले असे की, कळंब नगरपालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) चे तब्बल ९ नगरसेवक (८ निवडून आलेले आणि १ स्वीकृत) आणि काँग्रेसचा १, अशा एकूण १० नगरसेवकांनी गुरुवारी सोलापुरात जाऊन भाजपमध्ये थाटामाटात प्रवेश केला!
यात गंमत अशी की, या बहुसंख्य महिला नगरसेविका आहेत. राजकारणातल्या गप्पा ‘नीतिमत्तेच्या’ असल्या, तरी प्रत्यक्ष प्रवेश मात्र “पतीदेवाची आज्ञा प्रमाण” मानूनच झाला. निवडणूक होऊन जेमतेम सहा महिनेही उलटले नाहीत, तोच कालपर्यंत निष्ठेच्या आणाभाका घेणाऱ्या या नगरसेवकांना रात्रीतून असा कोणता ‘साक्षात्कार’ झाला? त्यांना कोणते ‘आमिष’ दाखवण्यात आले? याची रसभरीत चर्चा आता कळंबच्या चौकाचौकात रंगत आहे.
‘ऑपरेशन टायगर’ फुकट गेले, ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी!
सर्वात मोठा धक्का बसलाय तो खासदार ओमराजे निंबाळकर यांना! कारण ठाकरे गटाचे हे ९ नगरसेवक ओमराजेंचे कट्टर समर्थक मानले जात होते. ओमराजे शिंदे गटात गेल्यामुळे, हे नगरसेवकही त्यांच्यासोबत शिंदे गटात जाणार, असेच सर्वांना वाटत होते.
पण साहेबांनी (राणा पाटलांनी) असा काही ‘गेम’ केला की, तिथे ‘ऑपरेशन टायगर’ किंवा ‘धनुष्यबाण’ होण्याऐवजी थेट ‘ऑपरेशन लोटस’ झाले! ओमराजेंच्या तोंडचा घास साहेबांनी हिरावून घेतला. आता कळंबमध्ये एकाच प्रश्नाची कुजबूज सुरू आहे— “एका नगरसेवकाला नक्की किती ‘खोके’ मिळाले?”
ड्रग्जवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली… नाहीतर तोही आज ‘क्लीन’ असता!
या प्रवेश सोहळ्यातली सर्वात डार्क कॉमेडी (Dark Comedy) म्हणजे ठाकरे गटाचा तो एक नगरसेवक, जो १५ दिवसांपूर्वीच ‘ड्रग्ज’ (Drugs) प्रकरणात जेलमध्ये गेला आहे!
कळंबमध्ये आता उघडपणे अशी खिल्ली उडवली जात आहे की, “अरेरे! जर त्या पठ्ठ्याने १५ दिवसांपूर्वीच साहेबांचा हात धरून भाजपची ‘वॉशिंग मशीन’ वापरली असती, तर तो ड्रग्ज प्रकरणात आरोपीच झाला नसता! आज तोही ‘क्लीन’ होऊन सोलापूरच्या मंचावर हार घालून उभा दिसला असता!” जेलमध्ये बसलेला तो नगरसेवकही आता नक्कीच डोक्याला हात लावून बसला असेल, की आपण प्रवेश करायला १५ दिवस लेट झालो!
कळंबचे गणित अन् साहेबांचा ‘डॅमेज कंट्रोल’ प्लॅन
कळंब नगरपालिकेत एकूण १९ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत. उर्वरित संख्याबळ असे होते: ४ भाजप, ४ शिंदे गट, ९ ठाकरे गट आणि १ काँग्रेस. पण या एका प्रवेशाने साहेबांनी कळंब पालिकेचे गणितच फिरवून टाकले आहे.
पण हे आताच आणि सोलापुरातच का झाले? तर याचे खरे कारण धाराशिव भाजपच्या अंतर्गत बंडात लपले आहे. पक्षाचे सरचिटणीस सुनील राणे धाराशिवमध्ये येऊन गेले, तरी जुना आणि नवा वाद मिटला नाही; उलट तो आणखी चिघळला. याच वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापुरात आले होते.
“आमच्यावर जुने कार्यकर्ते बंडखोरीचा आरोप करतात ना? मग बघा, आम्ही पक्ष कसा वाढवतोय!” हे चव्हाण साहेबांना दाखवण्यासाठी आणि अंतर्गत वादावरून लक्ष वळवण्यासाठी राणा पाटील आणि भावी खासदार मल्हार पाटील यांनी कळंबमधील या १० नगरसेवकांची ‘खरेदी’ करून हे शक्तिप्रदर्शन केल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
पुढचा भडका अटळ!
साहेबांना वाटले असेल की या ‘ऑपरेशन लोटस’मुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षांसमोर वजन वाढेल. पण प्रत्यक्षात, यामुळे भाजपमधला ‘जुना विरुद्ध नवा’ वाद आता आणखी भयानक रूप घेणार आहे. कारण, ज्या जुन्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षाच्या सतरंज्या उचलल्या, त्यांच्या डोक्यावर आता हे काल आलेले आणि ‘खोके’ घेऊन आलेले नगरसेवक बसवले जाणार आहेत!
एकाधिकारशाहीमुळे आधीच धुमसत असलेल्या धाराशिव भाजपच्या कुरुक्षेत्रात साहेबांनी आता स्वतःहून पेट्रोल ओतले आहे. त्यामुळे पुढचा स्फोट किती मोठा असेल, हे पाहणे थरारक ठरणार आहे!




