धाराशिव: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, तसेच सोलापूर–धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या डीपीआरला (DPR) केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभाग समितीच्या पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत खासदार राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले.
बैठकीतील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
-
नवीन रेल्वेमार्ग व प्रकल्प: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर आणि धाराशिव–संभाजीनगर रेल्वेमार्गांच्या कामांना गती देणे; लातूर–औसा–उमरगा–कलबुर्गी तसेच शेगाव–पंढरपूर या नवीन रेल्वेमार्गांना तातडीने मंजुरी देणे.
-
स्थानक विकास व थांबे: बार्शी स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश करणे; संत गोरोबा काकांच्या तेर येथे नवीन रेल्वे स्थानक उभारून गाड्यांना थांबा देणे; लातूर–मुंबई गाडीला कळंब रोड तर पनवेल–नांदेड एक्सप्रेसला ढोकी स्थानकावर थांबा देणे.
-
नवीन सेवा व विस्तार: लातूर–पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करणे; लातूर रेल्वे पिट लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे; सांगली–परळी डेमू गाडी अकोलापर्यंत विस्तारित करणे.
-
प्रवासी सुविधा: लातूर–मुंबई रेल्वेला ५ नवीन जनरल डबे जोडणे आणि लातूर–धाराशिव–बार्शी मार्गावरील आरक्षित कोटा वाढवणे.
रेल्वे संपर्क अधिक सक्षम आणि गतिमान झाल्यासच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला खरी गती मिळेल, असे स्पष्ट करत बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांवर प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लावून धरली.






