राजकारणात कधी कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा प्रत्यय धाराशिवच्या आखाड्यात पुन्हा एकदा आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयमामा निंबाळकर यांनी थेट मुंबईत ‘मातोश्री’ गाठून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी हाती मशाल घेतली आणि धाराशिवच्या स्थानिक समीकरणांना नवा वेग आला.
जुने राजकीय हिशोब बाजूला, कैलास पाटलांची मोलाची साथ
या पक्षप्रवेशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंचावर आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच धाराशिव-कळंब मतदारसंघात संजय मामा आणि कैलास पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. त्या लढतीत कैलास पाटलांनी बाजी मारली होती, तर संजय मामांनीही तगडी मते घेत कडवी टक्कर दिली होती. मात्र, राजकारणातील जुनी कटुता विसरून आणि थेट मातोश्रीशी संवाद साधताना आमदार कैलास पाटील यांना विश्वासात घेऊनच हा पक्षप्रवेश पार पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ओमराजेंच्या पक्षांतरानंतरची राजकीय पोकळी भरून काढण्याची खेळी

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटासमोर नव्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ओमराजेंना टक्कर देऊ शकेल अशा सक्षम चेहऱ्याच्या शोधात असलेल्या ठाकरे गटासाठी संजय मामांचा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
२०२९ ची मोर्चेबांधणी आणि संभाव्य चेहऱ्यांची चर्चा
लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला, तरी धाराशिवमध्ये राजकीय पटलावर सोंगट्या आत्तापासूनच रचल्या जात आहेत. ओमराजेंविरोधात ठाकरे पक्षाकडून लोकसभेचा चेहरा कोण असणार? या चर्चेत आता दोन प्रमुख नावे पुढे येत आहेत:
-
माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर
-
नव्याने दाखल झालेले संजय मामा निंबाळकर
मातोश्रीने आखलेली ही नवी रणनीती आणि स्थानिक नेत्यांची झालेली एकजूट धाराशिवच्या आगामी राजकारणाला कोणती नवी दिशा देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






