वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील बाबा फायर वर्क्स या फटाका कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट होऊन आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील पाच जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी शेतकऱ्यांनी शेतातील बांध पेटवला होता. त्यातून उडालेल्या ठिणग्या बाबा फायर वर्क्स कारखान्यात पडल्याने हा भीषण स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात फटाके बनवून वाळवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि परिसरात एकच धावपळ उडाली.
सोलापूरला हलवण्यात आलेले गंभीर जखमी:
- अनिल माने (वय २८)
- चंद्रकांत उद्धव घाटुळे (वय ४०)
- साखरबाई गांधले (वय २५)
- शोभा मधुकर करडे (वय ४०)
- मंजुषा जालिंदर ओव्हाळ (वय ४५)
धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी:
- अभिजित संभाजी गायसमुद्रे (वय २६)
- शारदा राजेंद्र ओव्हाळ (वय ५३)
- सोनाली अभिजित गायसमुद्रे (वय २३)
सर्व जखमी हे कडकनाथवाडी येथील रहिवासी आहेत.
तेरखेडा येथे जवळपास २०० फटाके कारखाने आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्हा रुग्णालयात बर्न वार्ड नसल्याने जळीत, भाजलेल्या रुग्णांना तातडीने सोलापूरला हलवावे लागत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात बर्न वार्ड उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.